मित्रलाभ

पंचतंत्र-गोष्ट तीसावी

हातचे सोडून पळत्यामागे जाई, त्याच्यावर हातचेही गमावण्याची पाळी येई.

एका गावात ‘तीक्ष्णविषाण’ नावाचा एक धष्टपुष्ट बैल राहात होता. एकदा तो नदीकाठी पाणी प्यायला गेला असता, तिथे राहात असलेल्या प्रलोभक नावाच्या कोल्ह्याच्या बायकोचे लक्ष त्या बैलाच्या खाली लोंबत असलेल्या वृषणाकडे गेले. ते पाहून ती पतीला म्हणाली, ‘अहो, त्या बैलाचे मांसपिंड बघा किती खालीपर्यंत लोंबताहेत ! लवकरच ते तुटून जमिनीवर पडतील व आपल्याला खायला मिळतील. तेव्हा तो जिथे जाईल, तिथे आपणही जात राहू या.’

प्रलोभक कोल्हा म्हणाला, ‘कांते, ते मांसपिंड त्या बैलाच्या शरीराला एकसंध असे चिकटले असताना, ते खाली कसे पडतील ? तेव्हा रात्रीच्या वेळी या नदीकाठी पाणी प्यायला येणार्‍या उंदरांना पकडून आपण आजवर जसा चरितार्थ चालविला, तसाच पुढे चालवावा हे बरे. म्हटलंच आहे ना ?-

यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवाणि निषेवते ।

ध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव च ॥

(जो भरंवशाच्या गोष्टी सोडून बिनभरवंशाच्या गोष्टींमागे लागतो, त्याच्या हातून जे भरवंशाचे असते ते जाते आणि बेभरंवशाची गोष्ट तर गेल्यातच जमा असते.)

नवर्‍याचे हे बोलणे न पटून कोल्ही त्याला म्हणाली, ‘तुम्ही अगदीच अल्पसंतुष्ट आहात; त्यामुळे आहे ती परिस्थितीही तुम्हाला चांगली वाटते. म्हटलंच आहे ना ?-

सुपूरा स्यात्‌ कुनदिका सुपूरो मूषकाञ्जलिः ।

सुसन्तुष्टः कापुरुषः स्वल्पकेनापि तुष्यति ॥

(ओढ्याला थोड्याशा पावसानेही ‘महापूर’ येतो आणि त्या पाण्याने उंदराची ओंजळ भरून जाते. क्षुद्र पुरुष हा अशा लहानसान गोष्टींनीही संतुष्ट होऊन जातो. )

‘अहो, पुरुषाचं भाग्य केव्हा फळफळतं, हे तुम्हाला ठाऊक आहे का? नसल्यास ऐका -

यत्रोत्साहसमारम्भो यत्रालस्यविहीनता ।

नयविक्रमसंयोगस्तत्र श्रीरचला ध्रुवम् ॥

(जिथे उत्साहाने कामाला प्रारंभ केला जातो व जिथे आळशीपणा नसतो, त्याचप्रमाणे जिथे नीती व साहस यांचा संगम झालेला असतो, तिथेच लक्ष्मीचा निरंतर वास असतो. )

अविचारी बायकोच्या या बोचक बोलण्याने तो प्रलोभक कोल्हा सारासार विचार गमावून, तिच्यासह त्या बैलाच्या मागोमाग जाऊ लागला. अविचारी अशा स्त्रीच्या अधीन झालेला पुरुष, काय करायचे बाकी ठेवतो ? म्हटलंच आहे ना ? -

तावत् स्यात् सर्वकृत्येषु पुरुषोऽत्र स्वयं प्रभुः ।

स्त्रीवाक्यांकुशविक्षुण्णो यावन्नो ह्रियते बलात् ॥

(जोवर स्त्रीच्या वाक्यरूपी अंकुशाने जोराने टोचला जात नाही, तोवरच पुरुष हा या जगात सर्व बाबतीत आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो.)

पण एकदा का तो तिच्या आहारी गेला की -

अकृत्यं मन्यते कृत्यमगम्यं मन्यते सुगम् ।

अभक्ष्यं मन्यते भक्ष्यं स्त्रीवाक्यप्रेरितो नरः ॥

(अविचारी स्त्रीच्या बोलण्याने प्रेरणा मिळालेला पुरुष करू नये ते करणे योग्य मानू लागतो, जिकडे जाणे कठीण आहे तिकडे जाणे सोपे मानतो, आणि खाऊ नये ते खाण्यास योग्य आहेसे समजू लागतो.)

अशा रीतीने अविचारी बायकोच्या पूर्णपणे आहारी गेलेला तो कोल्हा सतत पंधरा वर्षे तिच्यासह त्या बैलाच्या पाठीपाठीशी हिंडत राहिला. पण त्या बैलाची वृषणे काही खाली गळून पडली नाहीत, आणि त्यामुळे ती त्या कोल्हाकोल्हीला खायला मिळाली नाहीत. शेवटी निराश झालेला तो कोल्हा पत्‍नीसह आपल्या मूळच्या राहण्याच्या ठिकाणी परत गेला.’

ही गोष्ट सांगून सोमिलक त्या अदृश्य पुरुषाला म्हणाला, ‘हे पुरुषश्रेष्ठा, तेव्हा इतर कुठल्याही वराचे आमिष न दाखवता, तू मला धनवान् होण्याचाच वर दे.’

यावर तो अदृश्य पुरुष म्हणाला, ‘सोमिलका, ठीक आहे. तुझी इच्छाच श्रीमंत होण्याची आहे, तर मी तुला तसा वर देईन. पण तत्पूर्वी तू पुन्हा त्या वर्धमान नगरीत जा. तिथे मृत्यु पावलेल्या एका व्यापार्‍याचे ‘गुप्तधन’ व ‘उपभुक्तधन’ या नावाचे दोन मुलगे आपापल्या स्वतंत्र वाड्यात राहतात. त्यांचा अनुभव घेऊन तू पुन्हा याच ठिकाणी ये व तुला त्या दोन भावांपैकी कुणासारखे व्हावेसे वाटते ते तू मला सांग, म्हणजे मी तुला तसा वर देईन.’ त्या अदृश्य पुरुषाच्या सांगण्यानुसार सोमिलक पुन्हा वर्धमान नगरीत गेला. त्याने प्रथम ‘गुप्तधना’ ची भेट घेतली व त्याच्याकडे रात्रीचे एक जेवण आणि त्याच रात्रीपुरती झोपायला जागा देण्याची विनंती केली.

कंजूष गुप्तधनाने सोमिलकाला प्रथम ‘फुकट्या’, ‘ऐतखाऊ’ अशा शिव्या देऊन हाकलून लावण्याचा प्रयत्‍न केला, पण सोमिलक ठाणच मांडून बसला. अखेर नाईलाज होऊन त्याने सोमिलकाला रात्रीपुरती, वाड्याच्या मागल्या उघड्या पडवीत राहण्यास परवानगी दिली व त्याच्या पुढ्यात अन्नाचे केवळ चार घास असलेली थाळी ठेवली. पण कंजूष गुप्तधन तेवढ्यावर थांबला नाही. पाहुण्याला चार घास अन्न दान करावे लागले, म्हणून त्या नुकसानीची भरपाई करून घेण्यासाठी, त्याने आपल्याला चार घास कमी अन्न वाढण्याचा हुकूम अगदी सोमिलकाला ऐकू जाईल, अशा आवाजात बायकोला फर्मावला. तो प्रकार पाहून सोमिलकाला त्याच्या श्रीमंतीचा उबग आला आणि ती रात्र त्याच्याकडे कशीबशी काढून, दुसर्‍या दिवशी सकाळी तो ‘उपभुक्तधना’ च्या वाड्यावर गेला.

उपभुक्तधनाने सोमिलक हा एक सामान्य कोष्टी आहे, हे कळूनही त्याची राहण्या-जेवण्याची अतिशय उत्तम व्यवस्था ठेवली. गोरगरिबांना तो करीत असलेला दानधर्म पाहून सोमिलकाने त्याला विचारले, ‘शेटजी, तुमचा भाऊ गुप्तधन हा तिकडे अतिशय कंजूषपणाने जगत असता, तुम्हाला हा एवढा खर्च कसा काय परवडतो ?’

उपभुक्तधन म्हणाला, ‘जो दुसर्‍यांना मदत करीत राहतो, त्याला देवसुद्धा कुठल्या ना कुठल्या तर्‍हेने मदत करतो. या देशाचे राजे परममित्र आहेत. ते मला अधुनमधून भरघोस सहाय्य करतात.’ उपभुक्तधन ही गोष्ट सांगत असतानाच राजसेवक रथातून आले, आणि उपभुक्तधनाला राजाकडील भेट म्हणून सुवर्णमोहरांनी भरलेली परात देऊन गेले. ते दृश्य पाहून संतुष्ट झालेल्या सोमिलकाने ‘आपणही उपभुक्तधनाप्रमाणेच संपत्तीचा उपभोग घेणारे व दान करणारे व्हावे,’ असे मनाशी ठरविले. मग उपभुक्तधनाप्रमाणेच संपत्तीचा उपभोग घेणारे व दान करणारे व्हावे, ‘असे मनाशी ठरविले. मग उपभुक्तधनाचा निरोप घेऊन तो आपल्या गावाच्या रस्त्याला लागला व वाटेत त्या ‘अदृश्या पुरुषा’ ची भेट झाल्यावर त्याने त्याच्याकडे तसाच वर मागितला.’

या गोष्टी सांगून मंथरक हिरण्यकाला म्हणाला, ‘मित्रा, तू धनधान्याचा साठा करण्यामागे लागलास, म्हणून तुझ्यावर हा प्रसंग ओढवला. लक्ष्मी ही चंचल असते. ती तीनपैकी कुठल्यातरी एका मार्गाने जाते.

दानं भोगो नाशस्तिस्त्रो गतयो भवन्ति वित्तस्य ।

यो न ददाति न भुङ्‌क्ते तस्य तृतीया गतिर्भवति ॥

(धन संपण्याचे तीन मार्ग आहेत. पहिला दान, दुसरा उपभोग व तिसरा नाश. जो दान करीत नाही वा उपभोगही घेत नाही, त्याचे धन तिसर्‍या मार्गाने नाहीसे होते. )

‘हिरण्यका, अरे धनधान्याचा बराच साठा जवळ असल्याने किंवा त्याचा येथेच्छ उपभोग घेतल्यानेच जीवन सुखी होते, असे थोडेच आहे ?

सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते

शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति ।

कन्दैः फलैर्मुनिवरा गमयन्ति कालं

सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम् ॥

(साप वारा पिऊन राहतात, म्हणून काही ते दुर्बल नसतात. सुके गवत खाऊनसुद्धा हत्ती बलवान होतात. कंदमुळे व फळे यांवर ऋषी निर्वाह करतात. तेव्हा संतोष हेच माणसाचे मोठ्यात मोठे सुखाचे निधान आहे.)

मंथरक पुढे म्हणाला, ‘हिरण्यका, अरे धन हे खरे धन नसून, संतोष हेच खरे धन आहे. म्हणून तर म्हटलं आहे -

दानेन तुल्यो निधिरस्ति नान्यो

लोभाच्च नान्योऽस्ति रिपुः पृथिव्याम् ।

विभूषणं शीलसमं न चान्यत्

सन्तोषतुल्यं धनमस्ति नान्यत् ॥

(दानासारखा दुसरा मोलाचा साठा नाही. या जगात लोभासारखा दुसरा शत्रु नाही. शीलासारखा दुसरा अलंकार नाही, आणि संतोषासारखे दुसरे धन नाही.)

याप्रमाणे उपदेश करून मंथरक शेवटी म्हणाला, ‘हिरण्यका, तू काही सामान्य नाहीस. अरे, जे निर्बुद्ध असतात, ते ओल्या मातीचा गोळा जमिनीवर आपटला असता जसा आपटल्या जागी पडून राहतो, तसे संकटात अवसान गाळून बसतात. पण जे बुद्धिमान् असतात, ते मात्र आपटलेल्या चेंडूप्रमाणे संकटामुळे दुप्पट वेगाने उसळी घेऊन वर येतात.’

मंथरकाचे हे बोलणे संपताच लघुपतनक हिरण्यकाला म्हणाला, ‘मित्रा, मंथरकाने केलेला उपदेश काहीसा कटु असला, तरी तो तुझ्या हिताचा आहे आणि हेच तर खर्‍या मित्राचं लक्षण आहे. म्हटलंच आहे -

अप्रियाण्यपि पथ्यानि ये वदन्ति नृणामिह ।

त एव सुह्रदः प्रोक्ता अन्ये स्युर्नामधारकाः ॥

(या जगात लोकांशी जे अप्रिय पण हितकारक बोलतात तेच खरे मित्र. बाकीचे नावाचे मित्र असतात. )

लघुपतनक याप्रमाणे हिरण्यकाला बोलत असतानाच चित्रांग नावाचे एक हरीण धापा टाकीत तिथे आले व म्हणाले, ‘एका पारध्याचा बाण निसटता लागल्यामुळे कसाबसा वाचलेला मी तुमच्या आश्रयाला आलो आहे. तेव्हा मला आधार द्या.’

यावर मंथरक म्हणाला, ‘मित्रा, शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्याचे दोन मार्ग आहेत.

द्वावुपायाविह प्रोक्रौ विमुक्तौ शत्रुदर्शने ।

हस्तयोश्चालनादेको द्वितीयः पादवेगजः ॥

(शत्रु दृष्टीस पडला असता त्याच्यापासून सुटका करून घेण्याचे दोन उपाय या जगात आहेत. एक तर त्याच्याशी दोन हात करणे, किंवा दुसरा उपाय म्हणजे पलायन करणे. )

प्रसंगाचे गांभीर्य लक्षात न घेता मंथरक उपदेश करण्यात वेळ घालवू लागल्याचे पाहून लघुपतनक कावळा पटकन् उडून जवळच्याच एका झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला व सभोवार नजर टाकून चित्रांगाला म्हणाला, ‘मित्रा, त्या पारध्याने तुझा नाद सोडून दिला आहे आणि मारलेल्या दोन हरिणांसह तो त्याच्या घरी चालला आहे तेव्हा तू निश्चिंतपणे या ठिकाणी वास्तव्य कर.’ मग तो चित्रांगही त्या तिघांसमवेत राहू लागला आणि सुभाषिते व दृष्टांतकथा एकमेकांना सुनावण्यात त्यांचा काळ फार मजेत जाऊ लागला.

एके दिवशी नित्याप्रमाणे दूरवर चरायला गेलेला चित्रांग, ठरलेल्या वेळी परत न आल्याने, मंथरकाच्या सांगण्यावरून लघुपतनक कावळा त्या वनावरून घिरट्या घालू लागला. तोच त्याला एका फासेपारध्याच्या जाळ्यात अडकून पडलेला चित्रांग दिसला. तेव्हा दुःखद मनाने त्याच्यापाशी जाऊन लघुपतनकाने त्याला विचारले, ‘मित्रा, तू एवढा सावध असताना या जाळ्यात कसा काय अडकलास ?’ यावर चित्रांगाने उत्तर दिले -

कृतान्तपाशबद्धानां दैवोपहतचेतसाम् ।

बुद्धयः कुब्जगामिन्यो भवन्ति महतामपि ॥

(यमपाशांनी बद्ध झाले असता, किंवा दैवाने मारायचे ठरविले असता, थोरामोठ्यांची बुद्धीही वाकड्या चालीने चालू लागते. )

‘तेव्हा लघुपतनका, इतर सर्व जाऊ दे. लवकरच पारधी येऊन, मला ठार मारून घेऊन जाणार असल्याने, तुझी व माझी ही शेवटची भेट आहे. म्हणून माझी विनंती हीच की, तुम्हा तिघांना जर मी जाणता अजाणता कधी दुखविले असेल तर मला क्षमा करा.’

लघुपतनक म्हणाला, ‘चित्रांगा, तू असा धीर सोडू नकोस. मी हिरण्यकाला घेऊन येतो. तो त्याच्या धारदार दातांनी हे जाळे तोडील आणि तुला मुक्त करील.’ बोलल्याप्रमाणे लघुपतनक आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेला व तातडीने हिरण्यकाला घेऊन परत आला. हिरण्यकाने ते जाळे भराभर तोडले व चित्रांगाला मुक्त केले.

तेवढ्यात हळूहळू मंथरकही आपल्याकडे येत असल्याचे पाहून, हिरण्यक व चित्रांग यांना लघुपतनक म्हणाला, ‘मंथरक इकडे आला, हे काही त्याने चांगले केले नाही. समजा, याच वेळी तो पारधी आला, तर आपण तिघे झटकन्‌ पळू शकतो, पण मंदगतीच्या मंथरकाचे कसे काय होणार ?’ लघुपतनकाचे बोलणे कानी पडल्यामुळे मंथरक त्याला म्हणाला, ‘अरे, ते सर्व मलाही कळते, पण जाळ्यात अडकलेला आपला चित्रांग मोकळा झाला की नाही, हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष इकडे आल्याशिवाय मला चैनच पडेना.’ मंथरकाचे हे बोलणे संपते न संपते तोच, खरोखरच पारधी आला. त्याला पाहून चित्रांग चौखूर धावून एका दूरच्या झुडुपात दडून राहिला. लघुपतनक उडून एका झाडावर जाऊन बसला, तर हिरण्यक हा जवळच्याच एका बिळात घुसला. मंथरक मात्र त्या पारध्याच्या हाती लागला.

जाळ्यातून हरीण निसटल्याचे पाहून पारध्याने मिळालेल्या कासवालाच घरी कालवणासाठी न्यायचे ठरविले. त्याला एका दर्भासनात गुंडाळून ठेवले आणि ते दर्भासन आपल्या जवळच्या बाणात अडकवून, तो घराची वाट चालू लागला.

तो थोडासा दूर जाताच, हिरण्यक, लघुपतनक व चित्रांग हे झटपट एकत्र आले. हिरण्यकाला तर दुःख आवरता आवरेना. अश्रु ढाळीत तो म्हणाला, ‘अरेरे ! माझा जन्म केवळ दुःखे भोगण्यासाठीच आहे का ? माझा वाडा आतील धनधान्याच्या साठ्यासह नष्ट झाला, माझा परिवार मला सोडून गेला, मला परदेशाचा आश्रय घ्यावा लागेल, प्रसंग आला ? संकटाबद्दल जे म्हटलं जातं ते काही खोटं नाही-

क्षते प्रहारा निपतन्त्यभीक्ष्णं धनक्षये वर्धति जाठाराग्निः ।

आपत्सु वैराणि सुमल्लसन्ति छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति ॥

(झालेल्या जखमेवरच पुनःपुन्हा लागत राहते. संपत्ती संपल्यावर भूक अतिशय तीव्र होऊ लागते. संकटकाळी नवी वैरे उत्पन्न होतात. एकदा का एका संकटाला वाट सापडली की अनेक संकटे येऊ लागतात.)

याप्रमाणे बोलता बोलताच आपले दुःख आवरते घेऊन हिरण्यक म्हणाला, ‘बाकी आता दुःख करण्यात वेळ न घालवता, मंथरकाला सोडविण्याचा उपाय शोधून काढला पाहिजे.’

यावर लघुपतनक म्हणाला, ‘मला एक युक्ती सुचते. तो पारधी ज्या वाटेने घरी जात आहे, त्या वाटेवर थोड्याच वेळात त्याला एक सरोवर लागेल. चित्रांगाने त्या पारध्याच्या दृष्टीस न पडता, आडवाटेने त्याच्यापुढे पळत जाऊन त्या तळ्याकाठी मृतवत् पडून राहावे, आणि मी त्याच्या मस्तकावर बसून, चोचीने त्याचा डोळा खात असल्याचे सोंग करावे, असे केले की, ‘चित्रांग मरून पडला आहे,’ असा त्या पारध्याचा समज होईल व हाती असलेल्या मंथरकाला जमिनीवर ठेवून तो चित्रांगाला उचलण्यासाठी त्याच्याकडे जाईल. तत्पूर्वीच हिरण्यकाला मी पाठीवर घेऊन तिकडे जातो व त्या पारध्याने मंथरकाला जमिनीवर ठेवताच, हिरण्यकाला मंथरकाभोवती गुंडाळलेल्या दर्भासनाचे पाश तोडण्याची सूचना देतो. तो पारधी चित्रांगाकडे जाऊ लागताच चित्रांग पटकन् पळून जाईल, व हिरण्यकाकडून मुक्त झालेला मंथरक, त्या पारध्याची पाठ असताना वेगाने तळ्यात शिरून दिसेनासा होईल.’ लघुपतनकाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी केले, आणि ती युक्ती सफल होऊन मंथरकाचे प्राण वाचले. मग ते चौघेही मित्र आपल्या मूळ ठिकाणी सुखात राहू लागले.’

अशा या गोष्टी सांगून दुसर्‍या तंत्राचा समारोप करताना विष्णुशर्मा त्या तीन राजकुमारांना म्हणाला, ‘मित्र हे प्रत्येकाच्या जीवनात आनंद व निर्भयता निर्माण करणारे एक अमोघ साधन आहे. म्हणून तुम्ही चांगले मित्र जोडा व सुखी व्हा. कारण मित्राबद्दल असं म्हटलं आहे -

यो मित्राणि करोत्यत्र न कौटिल्येन वर्तते ।

तैः समं न पराभूतिं संप्राप्नोति कथंचन ॥

(जो या जगात मित्र जोडून त्यांच्याशी कपटाने वागत नाही, त्याच्यावर पराभवाचे दुःख करण्याचा प्रसंग कधीच येत नाही. )

मित्रलाभ

पंचतंत्र-गोष्ट एकोणतीसावी

धनिक कंजूष का असेना, लोक तुकविती त्याच्यापुढे माना.

एका गावात सोमिलक नावाचा एक कोष्टी राहात होता. वस्त्रे विणण्यात तो अत्यंत कुशल असूनही, गावात त्याचे व त्याच्या कुटुंबाचे पोट भरेना. म्हणून त्याने नशीब काढण्यासाठी एखाद्या मोठ्या शहरात जाण्याचे ठरविले. त्याचा तो बेत कळताच त्याची बायको त्याला म्हणाली, ‘धनी, आपल्या दैवातच जर धन नसेल, तर दुसर्‍या गावी जाऊन तरी ते कसे मिळणार ? म्हटलेच आहे ना -

यथा धेनुसहस्त्रेषु वत्सो विन्दति मातरम् ।

तथा पुराकृतं कर्म कर्तारमनुगच्छति ॥

(ज्याप्रमाणे हजारो गाई एकत्र असल्या, तरी वासरू हे नेमके त्यांतील आपल्या आईला ओळखते, त्याचप्रमाणे पूर्वजन्मीचे बरेवाईट कर्म हे त्याच्या कर्त्याच्या पाठोपाठ त्याला ‘फळ द्यायला जाते.’)

यावर तो कोष्ठी म्हणाला, ‘कांते, तू चुकतेस. अगं -

यथैकेन न हस्तेन तालिका सम्प्रपद्यते ।

तथोद्यमपरित्यक्तं न फलं कर्मणः स्मृतम् ॥

(ज्याप्रमाणे एका हाताने टाळी वाजत नाही, त्याचप्रमाणे उद्योग केल्याशिवाय कर्माचे फळ हाती लागत नाही.)

बायकोला याप्रमाणे उत्तर देऊन सोमिलक कोष्टी वर्धमान नावाच्या नगरीत गेला. तिथे अपार श्रम घेऊन व आपल्या वस्त्रे विणण्याच्या व्यवसायात अवघ्या दोन वर्षात तीनशे सुवर्णमोहरांची माया जमवून, तो त्या मोहरांसह आपल्या गावी जायला निघाला.

अर्धी वाट चालून होताच संध्याकाळ झाल्यामुळे, तो त्या मोहोरांच्या गाठोड्यासह एका वडाच्या झाडावर चढला व त्याच्या एका रुंदसर फांदीच्या बेचक्यावर झोपला. रात्री झोपेत असताना, त्याच्या स्वप्नात प्रयत्‍नराव व नशीबराव या दोन पुरुषांचा संवाद त्याला ऐकू येऊ लागला. नशीबराव प्रयत्‍नरावाला विचारू लागला, ‘काय रे, या कोष्ट्याच्या नशिबात जेमतेम स्वतःचे कुटुंब पोसण्यापुरतेच द्रव्य असताना, तू याच्याजवळ तीनशे सुवर्णमोहरा कशा काय साठू दिल्यास ?’

प्रयत्‍नराव म्हणाला, ‘जे नशिबावर हवाला न ठेवता प्रयत्‍न करतात, त्यांच्या प्रयत्‍नाचे फळ मी त्यांच्या पदरात टाकतो. तुला वाटल्यास तू याच्या मोहरा घेऊन जा.’ हे स्वप्न पडताच सोमिलक खडबडून जागा झाला. बघतो, तर जवळच्या सर्व मोहोरा नाहीशा झालेल्या. तरीही खचून न जाता, तो पुन्हा वर्धमान शहरी गेला व अथक परिश्रम घेऊन, त्याने अवघ्या एका वर्षात पाचशे सुर्वणमोहरा साठविल्या आणि पुन्हा तो त्या मोहोरांच्या गाठोड्यासह गावी जाऊ लागला. पण काय आश्चर्य ! पुन्हा तसेच स्वप्न व पुन्हा त्या मोहोरांचे गाठोडे नाहीसे झालेले.

त्या प्रकाराने अतिशय निराश झालेला तो, गळ्याला फास लावून स्वतःचा देहान्त करायला सज्ज झाला असता एक अदृश्य पुरुष त्याला म्हणाला, ‘हे सोमिलका, तू कष्ट करून जगणारा आहेस ! त्यामुळे तुझ्याबद्दल मला आपुलकी वाटते. तेव्हा तू अशी आत्महत्या करू नकोस. एक संपत्ती सोडून तू मजकडे दुसरा, कुठलाही शक्यतेतला वर माग. तो मी तुला देईन. तुझ्या नशिबात जर मुबलक संपत्तीचा भोग घेणे नाही, तर ती तुला कशाला हवी ?’

सोमिलक म्हणाला, ‘प्रभू, तरीही तू मला भरपूर धनच दे. अरे, स्वतः उपभोग न घेता, किंवा दान न करता नुसताच धनाचा साठा करून ठेवणार्‍यालासुद्धा हे मूर्ख जग मान देते. तेव्हा तू मला भरपूर धन दिल्यावर, जरी मला याचा उपभोग घेता आला नाही, तरी लोकांकडून मान तर मिळेल ना ? कुणीकडून तरी काही पदरात पडल्याशी कारण. आयुष्यभर अथक परिश्रम घ्यायचे आणि पदरात मात्र काहीच नाही पडायचे, म्हणजे सतत पंधरा वर्षे फुकट भ्रमंती करीत राहणार्‍या त्या मूर्ख कोल्हाकोल्हीसारखी गत झाली की !’

‘ती गोष्ट काय आहे ?’ असा प्रश्न त्या अदृश्य पुरुषाने केला असता सोमिलक म्हणाला – ‘ऐक-

मित्रलाभ

पंचतंत्र-गोष्ट अठ्ठावीसावी

ज्याचे जे असे, त्याच्यापाशीच ते वसे.

एका गावी सागरदत्त नावाचा एक कंजूष वाणी राहात होता. त्याच्या बुद्धिवान् व वाचनाची आवड असलेल्या मुलाने एक मौल्यवान ग्रंथ बरीच किंमत मोजून विकत घेतला. त्या वाण्याला ही गोष्ट कळताच तो त्याच्यावर भडकून म्हणाला, ‘घरबुडव्या ! ग्रंथासाठी एवढा पैसा खर्च करायचा ? चालता हो घरातून. घरातून बाहेर हाकलून दिल्यावर तुझ्यावर रस्तोरस्ती फिरून भीक मागण्याची पाळी येणार आहे, हे लक्षात ठेव.’

मुलगा म्हणाला, ‘बाबा, तुमची आज्ञाच आहे, तर मी घरातून जातो. पण तुम्ही म्हणता तशी, मला भीकच मागावी लागेल असे मात्र नाही. कुणी सांगावं ? एखाद् वेळी रस्त्याच्या बाजूला बसून लोकांकडून भिक्षेचा स्वीकार करण्याऐवजी मी सिंहासनावर बसून लोकांकडून येणारे नजराणेसुद्धा स्वीकारीन. कारण ज्याला जे मिळायचे असते ते त्याला मिळतेच मिळते.’ असे म्हणून तो मुलगा घराबाहेर पडला.

मग भटकत भटकत तो एका नगरात गेला. कुणी त्याला ‘तू कुठून आलास ?’ असे विचारले की तो ‘प्राक्तनपुराहून’ असे उत्तर देई. कुणी त्याला ‘तुझं नाव काय ?’ असा सवाल केला की, तो ‘भाग्यदत्त’ असा जबाब देई.

एके दिवशी त्या नगरातील एका महोत्सवाला देशोदेशीचे राजे व राजकुमार आले होते. त्या नगरात राहणारी चंद्रावती नावाची तरुण व सुस्वरूप राजकन्या हीसुद्धा आपल्या एका दासीसह तो उत्सव पाहायला गेली होती. मध्येच तिचे लक्ष एका अत्यंत देखण्या व रुबाबदार तरुणाकडे गेले आणि ‘हाच आपला पती व्हावा, ‘ असे तिच्या मनात आले.

तिने लगेच आपल्या दासीसंगे त्याला आपले मनोगत कळविले व भेटीसाठी गुपचूप रात्री राजवाड्यातील आपल्या महालात येण्याबद्दल विनविले. राजवाड्याच्या दर्शनी बाजूला शिपायाचा खडा पहारा असल्याने, वाड्याच्या उजव्या कुशीकडील पहिल्या मजल्यावरच्या महालाच्या खिडकीतून खाली एक जाड दोरखंड सोडले जाईल व त्याच्या आधारानेच चंद्रावतीदेवींच्या महालात जाता येईल, असेही त्या दासीने त्या राजकुमाराला सांगितले. ही राजकन्या आपल्याला अगदी हवी तशीच आहे, असा विचार करून, त्या राजकुमारानेही तिच्याकडे येण्याचे मान्य केले. परंतु रात्री प्रत्यक्ष त्या राजकन्येकडे जाण्याची वेळ झाली असता, तो स्वतःशी म्हणाला, ‘चंद्रावतीचा पिता हा सम्राट असून, आपला पिता हा त्याचा मांडलिक आहे. मग एका अर्थी तिचा पती आपला स्वामी असताना आणि गुरू, मित्र, स्वामी किंवा सेवक यांच्या घरातील स्त्रियांकडे पापदृष्टीने पाहाणे हे धर्माविरुद्ध असताना, चंद्रावतीकडे जाणे अयोग्य आहे का ?’ मनात असा विचार येताच, त्या राजकुमाराने तिच्याकडे जाण्याचा बेत रद्द केला.

योगायोगाने त्याच रात्री भाग्यदत्त हा वाड्यावरून चालला होता. त्याने त्या वाड्याच्या पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली लोंबत असलेला दोरखंड पाहिला. तो मनात म्हणाला, ‘ज्या अर्थी हा दोरखंड मुद्दाम खाली सोडला आहे, त्या अर्थी तो तसा मुद्दाम लोंबत ठेवण्याचा राजाचा काहीतरी हेतु असावा, हे स्पष्ट आहे. आपण चढून वर जायला काय हरकत आहे?’ असे म्हणून तो राजाचा हेतु जाणून घेण्यासाठी त्या दोराच्या आधारे वर चढला आणि राजकन्येच्या महालात शिरला.

‘आपला प्रियकरच आला आहे,’ अशा समजुतीने चंद्रावतीने त्याचे अत्यानंदाने स्वागत केले. पण नंतर ‘हा तो नव्हे’ हे तिला उमजून आले. परंतु त्याच्या वागण्याने व बोलण्याने ती प्रभावित झाली. तिने त्याची माहिती काढली. ‘आपल्याला हा तरुण, पती म्हणून आवडत असला, तरी हा एका साध्या वाण्याचा मुलगा असल्याने आपले वडील व विवाहाला मान्यता देणार नाहीत,’ असे तिला वाटले. म्हणून तिने त्याला त्याच दोरीच्या आधारे निघून जाण्याची विनंती केली.

त्या महालातून खाली उतरल्यावर भाग्यदत्ताने ती उरलेली सर्व रात्र एका धर्मशाळेत घालविली आणि सकाळ होताच, भराभर प्रातर्विधी उरकून पुन्हा त्या नगरीतून फिरायला सुरुवात केली.

फिरता फिरता भाग्यदत्ताला, शृंगारलेल्या हत्तीवर बसलेला ‘वरकीर्ती’ नावाचा एक नवरदेव वर्‍हाडी मंडळींसह वधूपक्षाच्या वाड्याकडे चाललेला दिसला. तेवढ्यात एकाएकी काय झाले न कळे – तो हत्ती पिसाळला व चीत्कारत धावू लागला. त्याच्यावर बसलेल्या नवरदेवाने कशीबशी उडी मारून दूर पळ काढला. वर्‍हाडीमंडळींची ही पळापळ झाली. माहूत तर कुठल्याकुठे फेकला गेला ! भाग्यदत्त मात्र त्या हत्तीला आवरण्यासाठी त्याच्यापाठोपाठ धावू लागला.

योगायोगाने तो हत्ती रस्त्यालगत असलेल्या वधूपक्षाकडील मंडपाच्या प्रवेशद्वारापाशी गेला. तिथे नवरीमुलगी हाती पुष्पमाला घेऊन वराची वाट पाहात उभी होती. आता हा हत्ती तिला तुडवून मंडपात घुसणार, असे पाहून भाग्यदत्त एकदम त्या हत्तीच्या समोर उभा राहिला व ओरडून त्याला म्हणाला, ‘हे गजश्रेष्ठा ! अरे सर्व पशूंमध्ये तू बुद्धिमान् ना ? मग तुला या नवर्‍यामुलीला तुडवून, या मंडपात चालू असलेल्या मंगलाचे अमंगल करणे पसंत पडेल का ? नाही ना ? मग शांत हो.’ आणि काय चमत्कार ! भाग्यदत्ताचे हे शब्द ऐकून हत्ती एकदम स्तब्ध उभा राहिला ! आणि दुसर्‍याच क्षणी त्या नवरीने आपला प्राणरक्षक म्हणून भाग्यदत्ताच्या गळ्यात तो पुष्पहार घातला.

तिच्या पित्याला तिची ही कृती योग्यच वाटली व त्याने मंडपातल्या भटजींना वराच्या आसनावर भाग्यदत्ताला बसवून विवाहविधी सुरू करण्याची सूचना केली. पण तेवढ्यात सैरावैरा पळून गेलेला नवरदेव व त्याची वर्‍हाडी मंडळी मंडपात आली व नवर्‍यामुलीचे लग्न दुसर्‍याच कुठल्या तरुणाशी होत असल्याचे पाहून वधूपित्याशी कडाडून भांडू लागली.

त्याच वेळी त्या रस्त्याने राजकन्या चंद्रावतीसह राजा व राणी रथातून देवदर्शनाला चालली होती. मांडवात चाललेला गदारोळ ऐकून राजाने सारथ्याला रथ थांबवायला सांगून, घडलेला प्रकार समजून घेतला, व अतो संबंधितांना म्हणाला, ‘या मुलीचे लग्न जरी वरकीर्तीशी ठरले असले, तरी हिला भाग्यदत्ताने वाचविले आहे व शिवाय हिच्याही मनात त्याच्याशीच लग्न करायचे आहे, तेव्हा हिच्या इच्छेला मान द्यायलाच हवा.’

पित्याने याप्रमाणे निर्णय देताच, त्याच वेळी मागे येऊन उभी राहिलेली चंद्रावती पुढे झाली आणि आदल्या रात्री घडलेली हकीगत पित्याच्या कानात सांगून नंतर उघड म्हणाली, ‘पिताश्री, लग्नाच्या बाबतीत मुलीच्या इच्छेला मान द्यायलाच हवा, असं तुम्हीच नुकतेच म्हणालात ना ? मग या नवर्‍यामुलीच्या अगोदर मी या भाग्यवंतांना मनाने वरले असल्याने, खरे तर तिच्याऐवजी माझेच लग्न त्यांच्याशी झाले पाहिजे.’

राजा म्हणाला, ‘ठीक आहे. भाग्यदत्ताचं लग्न दोघींशीही होईल. मला मुलगा नसल्याने, माझ्या पश्चात् तोच या राज्याचा राजा होईल आणि तुम्ही दोघीही त्याच्या राण्या व्हाल व सुखाने नांदाल.’ आणि खरोखरच तसे झाले. मग राजा झाल्यावर भाग्यदत्ताने आपल्या आईवडिलांनाही आपल्याजवळ रहायला आणले व त्यांचे पुढले जीवन अतिशय सुखाचे झाले.’

ही गोष्ट मंथरक व लघुपतनक यांना सांगून हिरण्यक म्हणाला, ‘मित्रांनो, एकतर ‘माझ्या नशिबात जे असेल ते मला मिळेलच मिळेल’ यावर माझा विश्वास आहे आणि दुसरे म्हणजे तुमच्यासारख्या मित्रांचे सहाय्य मला लाभले आहे, मग मला निराश होण्याचे काय कारण ?

मंथरक म्हणाला, ‘हिरण्यका, अरे आम्ही तुला काय सहाय्य करणार ? खरं तर तुझ्यासारखा विचार व ज्ञानी मित्र आम्हाला मिळाला म्हणून आम्हालाच मोठा आधार वाटू लागला आहे. कारण खर्‍या मित्राविषयी असं म्हटलं जातं ना ?-

आपत्काले तु सम्प्राप्ते यन्मित्रं मित्रमेव तत् ।

वृद्धिकाले तु सम्प्राप्ते दुर्जनोऽपि सुह्रद् भवेत् ॥

(संकटाच्या वेळी जो मित्र म्हणून टिकून राहतो, तोच खरा मित्र. भरभराटीच्या काळात काय, एखादा दुष्टसुद्धा मित्र होऊ शकतो.)

मंथरक पुढे बोलू लागला, ‘हिरण्यका, तुझ्यासारख्याला मी काय शिकवावे ? तरीही एक गोष्ट तुला सांगतो की, संपत्ती किंवा वैभव यांना लोक देतात तेवढे महत्त्व जीवनात नक्कीच नाही. म्हटलंच आहे ना ?-

अभ्रच्छाया खलप्रीतिः सिद्धमन्नं च योषितः ।

किंचित् कालोपभोग्यानि यौवनानि धनानि च ॥

(ढगाची सावली, दुर्जनाचे प्रेम, शिजवलेले अन्न, तरुण स्त्रिया, त्याचप्रमाणे तारुण्य व संपत्ती यांच्यापासून फार थोडा वेळ आनंद घेता येतो.)

मंथरक पुढे म्हणाला, ‘त्यातून संपत्ती ही तर तशी फारच त्रासदायक आहे. ती मिळवताना, खर्च करताना, तिचे रक्षण करताना, अशा प्रत्येक वेळी वाट्याला यातनाच येतात. इतकेही करून समजा ती वाट्याला आली, तरी तिचा उपभोग घेण्याची व तिचे दान करण्याची अक्कल हवी ना ? नाहीतर नुसता धनाचा साठा करून पदरात काय पडणार आहे ? म्हणून तर त्या सोमिलिक कोष्ट्याने देवापाशी ‘तू मला संपत्तीचा उपभोग घेणारा स्वामी कर’ असा वर मागितला ना ?’

‘ती गोष्ट काय आहे ?’ असे लघुपतनक व हिरण्यक या दोघांनाही विचारले असता मंथरक म्हणाला, ‘ऐका-

Incoming search terms:

  • राजकन्या उचलली
मित्रलाभ

पंचतंत्र-गोष्ट सत्ताविसावी

हावेला तृप्ती ठाऊक नाही, शमवू पाहता ती वाढतच जाई.

एका गावात एक भिल्ल राहात होता. वन्य प्राण्यांच्या शिकारीवर तो आपले पोट भरी. एकदा त्याने नेम धरून सोडलेला बाण एका रानडुकराच्या जिव्हारी लागला. पण तशाही परिस्थितीत सूडाच्या भावनेने ते डुक्कर त्याच्या अंगावर धावून गेले व त्याने आपल्या सुळ्याने त्या भिल्लाचे पोट फाडले. त्यामुळे त्या भिल्लाला तर प्राणांना मुकावे लागले, परंतु लगेच त्याच्याजवळ ते डुक्करही थोडावेळ तडफडून मृत्यू पावले.

काही वेळाने तिथून एक कोल्हा चालला असता त्याला ते दोन मृत देह दिसले. ते पाहून तो स्वतःशीच म्हणाला, ‘वा ! दैव ही किती अजब चीज आहे. कधी प्रयत्‍नांची पराकाष्ठा करूनही पदरात माती पडते. तर कधी जराही प्रयत्‍न केले नसताना हाती घबाड येते ! आता हे दोन मृत देह मी एकटा बरेच दिवस अगदी पुरवून पुरवून खाईन. त्या दृष्टीने आज फक्त या भिल्लाच्या बाणाच्या टोकाला अडकून राहिलेल्या डुकराच्या मांसखंडावर मी माझी भूक भागवीन.’ असे म्हणून त्या लोभी कोल्ह्याने पटकन त्या बाणाचे अणकुचीदार टोक आपल्या तोंडात घातले. त्याबरोबर ते त्याच्या एकदम तोंडात घुसून डोक्यातून शेंडीसारखे बाहेर आले. अति हावेपायी तो कोल्हाही तिथे मरून पडला. म्हणून कुठल्याही गोष्टीची अति हाव धरू नये.’

ब्राह्मणाने ही गोष्ट सांगताच त्याची बायको शांडिली त्याला म्हणाली, ‘नाथ, तुमचे म्हणणे मला पटले. घरात तीळ आहेत ते मी अगोदर गरम पाण्यात धुवून स्वच्छ करते व वाळवते आणि मग एखाद्या ब्राह्मणाला जेवायला बोलावून त्याला ते दान म्हणून देते. तुम्ही निश्चिंतपणे बाहेरगावी जा.’

मग तो ब्राह्मण घरातून निघून जाताच, शांडिलीने घरातले तीळ धुवून स्वच्छ केले व पुढल्या अंगणात वाळत घातले. पण ते तीळ वाळत असता, जवळून जाणारे एक खट्याळ कुत्रे नेमके त्या तिळांवर मुतले व निघून गेले ! ते पाहून शांडिली चरफडत स्वतःशी म्हणाली, ‘या मेल्या खोडसाळ कुतरड्याला मुतायला भूलोकावर दुसरी जागाच सापडली नाही का ? आता काही या तिळांचे दान करता येणार नाही. तेव्हा हे पुन्हा धुवून व वाळवून गावातल्या एखाद्या भोळसर बाईला साध्या तिळांच्या बदली द्यावेत.’ मनाशी असे ठरवून ती ते तीळ धुवून व वाळवून झाल्यानंतर एका घरी गेली व त्या घरातल्या बाईला भेटली.’

‘साध्या तिळांच्या बदल्यात शांडिली चांगले धुवून स्वच्छ केलेले तीळ देते, ‘या विचाराने त्या घरातली बाई घरचे साधे तीळ घेऊन बाहेर आली. पण तेवढ्यात तिचा मुलगा तिला म्हणाला, ‘आई ज्या अर्थी शांडिलीकाकू तिच्याकडले धुवून साल काढून स्वच्छ केलेले तीळ आपल्याकडल्या साध्या तिळांच्या बदल्यात द्यायला तयार झाली आहे, त्या अर्थी तिच्या तिळांत नक्की काहीतरी दोष आहे.’ मुलाचे हे म्हणणे पटल्यामुळे ती बाई – आणलेल्या साध्या तिळांसह – तशीच घरात परत गेली.

महादेवाच्या मंदिरातील ताम्रचूडाच्या मित्राने त्याला ही गोष्ट सांगून विचारले, ‘काय रे, तो शक्तिशाली उंदीर कुठल्या वाटेने त्याच्या बिळाकडे जातो हे तुला ठाऊक आहे का?’ ताम्रचूडाने होकारार्थी मान हलवताच त्याचा मित्र म्हणाला, ‘तर मग तू कुदळ तयार ठेव. उद्या उजाडताच आपण त्याच्या बिळाचा शोध घेऊ आणि ते खणून नाहीसे करू.’

आपल्या जीवनातील दुःखद घटना इथवर सांगितल्यावर हिरण्यकाने मध्येच एक दीर्घ उसासा सोडला व मग तो आपले मित्र लघुपतनक व मंथरक यांना म्हणाला, ‘मित्रांनो, त्या पाहुण्या जोग्याच्या तोंडचे हे शब्द ऐकून माझे अवसान पार गळून गेले. हा पाहुणा आता आपला ‘किल्ला’ खणून काढणार, आपला धनधान्याचा साठा उद्ध्वस्त करणार आणि आपल्यालाही ठार करणार या विचाराने मी माझ्या अनुयायांसह एखाद्या सुरक्षित स्थळी जाता यावे या हेतूने वेगळ्या वाटेने जाऊ लागलो. तेवढ्यात एका गलेलठ्ठ बोक्याने आम्हाला वाटेत गाठले व आमच्यापैकी दोघातिघांना ठार केले, तर काहींना जखमी केले.

‘जखमी झालेले उंदीर, मी त्यांना नको त्या वाटेने नेऊन संकटात लोटल्याबद्दल मला शिव्या देत देत, आपापल्या बिळांकडे निघून गेले पण त्यांच्या जखमांतून वाटेत पडलेल्या रक्ताच्या थेंबांवरून मागोवा घेत घेत, दुसर्‍या दिवशी सकाळी ताम्रचूड व त्याचा पाहुणा माझ्या किल्ल्यापर्यंत गेले आणि त्यांनी माझे घर व त्यातील धनधान्याचे साठे कुदळीने खणून पार उद्‌ध्वस्त केले. ते दृश्य जेव्हा मी दुरून लपून पाहिले, तेव्हा माझ्यावर जणु दुःखाचे आकाशच कोसळले.

‘ताम्रचूड व त्याचा मित्र हे जेव्हा माझ्या वैभवशाली किल्ल्याची स्थिती एखाद्या उजाड स्मशानाप्रमाणे करुन निघून गेले, तेव्हा मीही कुठेतरी दूर पळून गेलो असणार, अशा समजुतीने माझे बहुतांश अनुयायी, आता या कफल्लक हिरण्यकाजवळ राहण्यात काय अर्थ आहे – असे एकमेकांपाशी म्हणत व माझी निंदानालस्ती करीत, माझ्या एका शत्रूला जाऊन मिळाले.

‘मित्रांनो, तरीही मी धीर सोडला नाही. मी पुन्हा पूर्वीप्रमाणे त्या देवळात जाऊन खुंटीवरचे धान्य फस्त करण्याचे ठरविले व त्या गोसाव्यांची चीजवस्तू नासाडून त्यांना धडा शिकविण्याचे ठरविले. पण देवळात जाऊन त्या अन्नाची हंडी टांगलेल्या खुंटीवर उडी घेण्याचा प्रयत्‍न केला असता, माझी उडी तिथवर पोहोचेना. ‘आता काय करायचं ?’ याचा मी विचार करू लागलो. ताम्रचूडाशी बोलत असलेल्या त्या पाहुण्या गोसाव्याचे शब्द माझ्या कानी पडले. तो ताम्रचूडाला म्हणत होता, ‘मित्रा, संपत्तीची ऊब नाहीशी होताच, त्या शक्तिशाली उंदराची मस्ती मी म्हटल्याप्रमाणे जिरली ना ? आता तो त्या खुंटीवरचं अन्न खायला यायचा बंद झाला. ज्याच्यावर लक्ष्मीचा कोप होतो, तो पुरुष या व्यवहारी जगात कवडीमोलाचा ठरतो, म्हटलंच आहे ना?-

दंष्ट्राविरहितः सर्पो मदहीनो यथा गजः ।

तथार्थेन विहीनोऽत्र पुरुषो नामधारकः ॥

(जसा दात काढलेला सर्प किंवा मदहीन हत्ती असतो, तसाच जवळ पैसा नसलेला पुरुष हा केवळ या जगात नावाला पुरुष असतो.)

याप्रमाणे तो पाहूणा बैरागी ताम्रचूडाशी बोलत असतानाच त्याचे लक्ष माझ्याकडे गेले. लगेच हाती काठी घेऊन त्याने माझा पाठलाग सुरू केला व त्याने हातातल्या काठीचा एक फटकाराही मला मारला. पण केवळ माझ्या आयुष्याची दोरी बळकट, म्हणून मी त्यातून कसाबसा वाचलो व त्यानंतर दुसरा किल्ला उभारून त्यात राहू लागलो. अश दुःखमय स्थितीत दिवस कंठीत असता, माझी व लघुपतनका, तुझी मैत्री जुळून आली. मला तो नवा आधार वाटू लागला. तरीही जिथे मी वैभवात दिवस काढले, तिथे दीनवाण्या स्थितीत राहणे अयोग्य वाटल्याने, लघुपतनका, तू इकडे येण्याचे ठरविताच, मीही तुझ्यासंगे या परक्या देशात आलो.’

हिरण्यकाची ती करुण कहाणी ऐकून झाल्यावर मंथरक त्याला म्हणाला, ‘मित्रा, बुद्धिवंतांना व गुणवंतांना कुठलाच देश परका नसतो. ते जिथे जातात, तो देश त्यांना आपले मानतो. तेव्हा तू इतःपर दुःख न मानता, इथे सुखात राहा.’

हिरण्यक म्हणाला, ‘नाही मित्रांनो, मी भूतकाळातल्या दुःखांचे कोळसे उगाळत बसणारा नाही. माझे आता असे मत झाले आहे की, जे माझे आहे, ते कुणी हिरावून नेऊ शकत नाही. आणि जे माझे नाही ते – समजा योगायोगाने काही काळापुरते मजपाशी आले, तरी ते – फार काळ माझ्याजवळ राहू शकत नाही. त्या सागरदत्ताच्या मुलाची गोष्ट माझ्या या विधानाला पुष्टीच देणारी आहे.’

‘ती गोष्ट काय आहे?’ अशी पृच्छा मंथरक व लघुपतनक या दोघांनीही मोठ्या उत्कंठेने केली असता हिरण्यक सांगू लागला -

मित्रलाभ

पंचतंत्र-गोष्ट सव्विसावी

जो मनुष्य दुसर्‍यासाठी त्याग करतो, त्याच्याच जगण्याला अर्थ असतो.

एकदा मी एका व्रताच्या पालनासाठी एका गावातील गरीब ब्राह्मणाच्या घरी राहात असता, एके दिवशी पहाटे तो ब्राह्मण व त्याची बायको यांच्यात चाललेला संवाद माझ्या कानी पडू लागला -

ब्राह्मण म्हणाला, ‘आज संक्रांतीनिमित्त मी दान घेण्यासाठी बाहेरगावी जात आहे. तूही आज एखाद्या गरीब ब्राह्मणाला घरी जेवायला बोलावून त्याला काहीतरी दान दे.’

ब्राह्मणी भडकून म्हणाली, लग्न झाल्यापासून मला चांगले दागदागिने व उंची वस्त्रे तर सोडाच, पण सुग्रास अन्नही कधी खायला मिळालं नाही आणि त्या ब्राह्मणाला काय खायला घालू, तुमचं कपाळ ?’

ब्राह्मण शांतपणे म्हणाला, ‘कांते, अगं धन हे इच्छेनुसार का प्राप्त होत असतं ? नाही ना ! तेव्हा आपल्याला जे मिळेल, त्यात समाधान मानावे आणि कुवतीप्रमाणे दान करावे. एखाद्या धनिकाने भरपूर धनाचे दान केले आणि एखाद्या गरीबाने जरी एका कवडीचे दान केले, तरी दोघांच्या पदरात पुण्य सारखेच पडते. शास्त्र तर असं सांगतं -

दाता लघुरपि सेव्यो भवति न कृपणो महानपि समृद्ध्या ।

कूपोऽन्तः स्वादुजलः प्रीत्यै लोकस्य न समुद्रः ॥

( दाता हा जरी क्षुल्लक असला तरी तो सेवेला पात्र होतो आणि कृपण हा जरी कितीही श्रीमंत असला, तरी तो सेवेला पात्र होत नाही. [अथांग जलसंपत्ती असलेला] सागर नव्हे, तर गोड्या पाण्याची छोटी विहीरच लोकांच्या प्रेमाला पात्र होते.)

‘कांते, संपत्ती ही सावलीसारखी बेभरंवशाची असते. ती कधी असते, तर कधी नाहीशी होते. पण दानापासून मिळणारे पुण्य चिरकाल साथ देते. मात्र ते दान सारासार विचाराने करायला हवे. म्हटलेच आहे -

सत्पात्रं महती श्रद्धा देशे काले यथोचिते ।

यद्दीयते विवेकज्ञैस्तदनन्ताय कल्पते ।

(योग्य स्थळ व काळ विचारात घेऊन, सत्पात्र व्यक्तीला विवेकी माणसे जे दान मोठ्या श्रद्धेने करतात, त्याचे फळ – म्हणजे पुण्य – अनंत काळपर्यंत टिकते.)

तो ब्राह्मण पुढं म्हणाला, ‘कांते, केवळ धनाचीच नव्हे, तर कुठल्याही गोष्टीची हाव, जीवन जगता येण्यापुरत्या मर्यादेत हवी. तिचा अतिरेक झाला, की त्या कोल्ह्याच्या मस्तकातून जसे धनुष्याचे टोक शेंडीसारखे बाहेर आले, तशी प्राण्याची गत होते.’

‘ती गोष्ट काय आहे?’ अशी विचारणा त्या ब्राह्मणीने केली असता ब्राह्मण म्हणाला, ‘त्याचं असं झालं-

Incoming search terms:

  • मराठी रांड
  • मराठी गावातली रांड
  • मराठी रांडा