लब्धप्रणाश

पंचतंत्र-गोष्ट एकोणसाठावी

आपल्याला वाटे ‘हा आपला असे’ पण तोच पाठीत सुरा खुपसे.

दुष्काळामुळे अन्नपाणी मिळेनासे झाल्याने ‘चित्रांग’ या नावाचा एक धाडसी कुत्रा, दुष्काळ वगैरे नसलेल्या दूरच्या देशातील एका गावी गेला. तिथे गेल्यावर कुणा ना कुणाच्या घरात शिरून, तो नाना तर्‍हेचे रुचकर पदार्थ खायला मिळवत असे, पण त्या घराबाहेर पडताच त्याच्याभोवती कुत्रे जमत व त्याच्यावर भुंकून, वा त्याला चोप देऊन हैराण करीत. अखेर आपला देशच बरा होता. तिथे अन्नाच्या टंचाईमुळे आपल्या जातभाईंमध्ये भुंकण्याचावण्याचे त्राण उरले नसल्याने आपल्याला कुणाचा तसा त्रास नव्हता, असा विचार करून तो कुत्रा स्वदेशी परतला.

पददेशाहुन परतल्यावर गावातल्या कुत्र्यांनी ‘चित्रांगा, परदेश कसा काय होता?’ असा प्रश्न त्याला केला असता त्याने उत्तर दिले, ‘तिकडे अन्नपाणी भरपूर आणि ईश्वरकृपेने बायकाही मंद गतीच्या व गाफील असल्याने, कुणाच्याही घरात शिरून मला नानातर्‍हेच्या पदार्थांवर ताव मारता येई. गोष्ट वाईट ती हिच की, आपले तिथले जातभाई एकमेकांना पाण्यात पाहणारे, व परस्परांबद्दल शत्रूत्वभावना ठेवणारे आहेत.’

ही गोष्ट सांगून ताम्रमुख वानर त्या मगराला म्हणाला, ‘तेव्हा तुझ्या घरात घुसलेल्या त्या हडेलहप्पी मगराचा तू नाश कर, म्हणजे त्यात तुला सुखाने राहता येईल.’ त्या मगराने तसे केले, आपले घर परत मिळविले व पुढले आयुष्य सुखात व शांततेत घालविले.

या गोष्टी त्या तीन राजकुमारांना सांगून चौथ्या तंत्राचा समारोप करीत असता विष्णुशर्मा म्हणाला, ‘पराक्रम व धाडस हे गुण अंगी असल्याशिवाय कुणाला वैभव प्राप्त होत नाही, आणि समजा, योगायोगाने ते प्राप्त झाले तरी, त्याला त्या कष्टप्राप्त वैभवाची रुची येत नाही. म्हटलंच आहे-

अकृत्य पौरुषं या श्रीः किं तयापि सुभोग्यया ।

जरद्‌गवोऽपि समश्नाति दैवादुपगतं तृणम् ॥

(पराक्रम न करता जे वैभव प्राप्त होते, त्याचा उपभोग घेण्यात कसली गोडी आली आहे ? तसा म्हातारा बैलसुद्धा नशिबाने पुढ्यात येणारे गवत खाऊन दिवस ढकलतोच.)

लब्धप्रणाश

पंचतंत्र-गोष्ट अठ्ठावन्नावी

काळ पाहून उपाय योजावे आणि आपले घोडे विजयाकडे दौडवावे.

महाचतुरक नावाच्या एका कोल्ह्याला वनात हिंडत असता, एक मेलेला हत्ती आढळला. ‘हा हत्ती आपल्याला एकट्यालाच खायला मिळावा,’ यासाठीच्या उपायाचा तो विचार करीत असतानाच त्या ठिकाणी एक सिंह आला. त्याला पाहून तो मोठ्या नम्रतेनं म्हणाला, ‘दुसर्‍याने मारलेले वा स्वतःहून मेलेले श्वापद महाराज कधी खात नाहीत. तरीही जर त्यांना फारच भूक लागलेली असली, तर त्यांना यथेच्छ हात मारता यावा, यासाठी मी या मृत हत्तीची राखण करीत बसलो होतो.’ त्याचे हे बोलणे ऐकून तो सिंह म्हणाला, ‘चतुरका, तुझं म्हणणं खरं आहे. शास्त्रच मुळी सांगतं-

वनेऽपि सिंहा मृगमांसभक्षा बुभुक्षिता नैव तृणं चरन्ति ।

एवं कुलीना व्यसनाभिभूता न नीतिमार्गं परिलङ्घयन्ति ।

(पशूंचे मांस भक्षण करून त्यावर जगणारे वनातले सिंह हे जरी भुकेने व्याकूळ झाले, तरी ते गवत खात नाहीत. तसेच जे कुलवन असतात, ते जरी संकटात सापडले, तरी नीतीचा मार्ग सोडून वागत नाहीत.)

याप्रमाणे बोलून व ‘तो हत्ती मी तुलाच इनाम देत आहे,’ असे म्हणून सिंह तिथून निघून जातो न जातो तोच, एक वाघ तिथे टपकला. ‘हा वाघ या हत्तीला खाईल व त्याची हाडे तेवढी मागे ठेवील, असा विचार मनात येऊन तो महाचतुरक त्याला म्हणाला, ‘वाघोबा, केवळ तुमच्याबद्दल वाटणार्‍या आपुलकीपोटी, मी तुम्हाला एक गुपित सांगतो. सिंहमहाराज या हत्तीची शिकार करून नदीवर स्नानाला जाताना मला म्हणाले, ‘इथे जर कुणी वाघ आला तर त्याच्याशी गप्पा मारीत त्याला थांबवून ठेव. गेल्या महिन्यात मी एक शिकार करून नदीवर स्नानाला गेलो असता एका वाघाने ती शिकार उष्टावली. तेव्हापासून या वनात एकही वाघ जिवंत न ठेवण्याची प्रतिज्ञा मी केली आहे.’ चतुरकाचे हे बोलणे ऐकून त्या वाघाने तिथून पळ काढला.

नंतर आलेल्या चित्त्याच्या दाढा मजबूत व धारदार असल्याने, महाचतुरकाने त्याला तो हत्ती खाण्याचा आग्रह केला. पण वरचे राठ व चिवट कातडे त्या चित्त्याने फाडताच महाचतुरक त्याला खोटेच म्हणाला, ‘चित्तूकाका, सिंह आला. पळा, पळा, पळा.’ चित्त्याला ते खरे वाटून त्याने पळ काढला. त्याच्यानंतर आलेला कोल्हा तुल्यबळ असल्याने त्याच्याशी दोन हात करून महाचतुरकाने त्याला पळवून लावला व सवडीनुसार पण एकट्याने त्या हत्तीला खाऊन खलास केला.’

ही गोष्ट त्या मगराला सांगून ताम्रमुख वानर त्याला म्हणाला, ‘हे मगरा, तुझ्या घरात शिरलेल्या तुझ्या जातवाल्याशी तू शर्थाने लढून त्याला पळवून लाव. मग तुला कुणीही त्रास देणार नाही. कारण प्रत्येकाचे खरे पण छुपे शत्रू त्याच्या जातीतच असतात. म्हणून तर परदेशात जाऊन आलेल्या चित्रांग नावाच्या कुत्र्याने तिकडे त्याला तसाच आलेला अनुभव आपल्या गावकरी कुत्र्यांना सांगितला ना?”

‘तो कसा ? असा प्रश्न मगराने केला असता ताम्रमुख म्हणाला, ‘ऐक-

Incoming search terms:

  • मुंगी आणि कबूतर
  • कबूतर व मुंगी गोष्ट
  • पिळदार
  • हत्ती व कोल्हा
लब्धप्रणाश

पंचतंत्र-गोष्ट सत्तावन्नावी

जो सज्जनांचा उपदेश अव्हेरी, तो स्वतःचेच नुकसान करी.

उज्ज्वलक नावाचा एक सुतार बाहेरगावी चालला असता, त्याला वाटेत लागलेल्या झाडीत एक उंटीण व्यायलेली आढळली. तिला व तिच्या पिल्लाला घेऊन तो घरी गेला व त्याने त्यांचा चांगला सांभाळ केला. पिल्लाच्या गळ्यात त्याने एक घंटा बांधली.

त्या उंटिणीच्या दुधावर त्याला पैसा मिळू लागताच, त्याने तात्पुरते कर्ज काढून आणखी काही उंट-उंटिणी खरेदी केल्या. उंटिणीचे दूध व त्यांना होणारी पिल्ले तो विकी व पैसे मिळवी. एरव्ही त्याचे उंट व उंटिणी चरण्यासाठी वनात नेऊन सोडी. तिथे ते एकत्रपणे चरत. गळ्यात घंटा बांधलेले पिल्लू तेवढे आपण इतरांपेक्षा कुणी विशेष आहोत, अशा ताठ्याने इतरांपासून दुर राहून चरे.

‘तू असा एकटा चरत राहू नकोस,’ असा उपदेश त्याला काही सूज्ञ व सज्जन उंटउंटिणींनी अनेक वेळा केला. पण त्यांच्याकडे त्याने दुर्लक्ष केले. अखेर एके दिवशी संध्याकाळी ते सर्व उंट-उंटिणी वनातून घराकडे चालले असता, मुद्दाम मागे राहिलेल्या त्या घंटाधारी गर्विष्ठ पिल्लाला एका सिंहाने फाडून खाल्ले.’ ही गोष्ट सांगून ताम्रमुख वानर म्हणाला, ‘हे मगरा, त्या उंटाच्या पिल्लाप्रमाणेच तूही मूर्क आहेस. म्हणुन मी तुला उपदेश करणार नाही.’

तो मगर म्हणाला, ‘ताम्रमुखा, मी मूर्ख आहे, वाईट आहे, हे तर खरेच ! पण चांगल्याशी कुणीही चांगले वागतो. वाईटाशीही जो चांगला वागतो, त्यालाच सज्जन म्हटले जाते ना ? मग तू एक सज्जन असल्यामुळे मी माझे घर परत कसे मिळवू या बाबतीत मला मार्गदर्शन कर.’

यावर ताम्रमुख म्हणाला, ‘आता तू माझा पिच्छाच पुरविला आहेस तर सांगतो. प्राप्त परिस्थितीत तू तुझे घर बळकावून बसलेल्या त्या दांडगट मगराशी द्वंद्वयुद्ध करून व त्याचा पराभव करून त्याला हाकलून दे. कारण म्हटलंच आहे -

उत्तमं प्रणिपातेन शूरं भेदेन योजयेत् ।

नीचमल्पप्रदादेन समशक्तिं पराक्रमैः ॥

(जो श्रेष्ठ असेल त्याच्यापुढे हात जोडून, जो पराक्रमी असेल त्याच्या बाबतीत भेदनीतीचा अवलंब करून, नीच असेल त्याला थोडीफार लाच देऊन, तर तोडीस तोड असलेल्यांना पराक्रम दाखवून आपले काम साधावे.)

याप्रमाणे सांगून शेवटी तो वानर म्हणाला, ‘हे मगरा, महाचतुररक नावाच्या एका कोल्ह्याने याच तंत्राचा वापर करून, एक मेलेला हत्ती आपल्या एकट्याच्या पदरात पाडून घेतला.’

‘तो कसा काय?’ असे त्या मगराने विचारले असता ताम्रमुख म्हणाला, ‘त्याचं असं झालं-

लब्धप्रणाश

पंचतंत्र-गोष्ट छप्पन्नावी

घातक्याचे शस्त्र दुधारी, ते दुसर्‍याबरोबर धन्याचाही घात करी.

एक सुखवस्तू पण अशक्त व गरीब स्वभावाचा शेतकरी होता. त्याची बायको एका पिळदार शरीराच्या व देखण्या भामट्यावर भाळली आणि त्याने तिला लग्नाचे वचन दिल्याने, एका पहाटे दागदागिने, पैसे व कपडेलत्ते यांसह त्याच्यासंगे पळून जाऊ लागली.

रस्ता चालता चालता सकाळ झाली आणि त्यांना वाटेत एक नदी लागली. तेव्हा तो भामटा तिला म्हणाला, ‘लाडके, तू बरोबर आणलेल्या बोचक्यातले मौल्यवान कपडे व दागदागिने भिजून खराब होऊ नयेत म्हणून, ते बोचके मी अगोदर नदीच्या पैलतीरावर नेऊन ठेवतो आणि मग तुला उचलून नेण्याकरिता परत इकडे येतो.’ त्याप्रमाणे दागदागिने, पैसे व मौल्यवान कपडे असलेले आपल्याजवळचे बोचके तिने त्याच्या हवाली केले. ते हाती येताच तो नदी पार करून पलीकडे गेला व मोठ्याने ओरडून तिला म्हणाला, ‘या उतारवयातही लग्नाच्या नवर्‍याला सोडून माझ्यासारख्या अनोळखी माणसाशी लग्न करायला तयार झालेली तू, उद्या माझ्याहीपेक्षा तरुण व देखणा माणूस आढळल्यास त्याच्याबरोबर पळून कशावरून जाणार नाहीस ? तेव्हा तुझ्याशी लग्न करायला मी काय मूर्ख आहे ?’ एवढेच तो भामटा म्हणाला आणि त्या बोचक्यासह निघून गेला.

या प्रकाराने डोके सुन्न झाल्यामुळे नदीकाठच्या वाळवंटात बसून ‘आता पुढे काय करायचे?’ या गोष्टीचा ती विचार करू लागली. इतक्यात तोंडात मांसखंड धरलेली एक कोल्ही तिथे आली. नदीकाठच्या उथळ पाण्यात एक मोठा मासा आल्याचे पाहून, त्याला पकडण्यासाठी तिने तोंडातला मांसखंड वाळवंटात ठेवून त्याच्याकडे धाव घेतली. पण त्यामुळे तो मासा घाबरून खोल पाण्यात निघून गेला आणि इकडे तो वाळवंटात ठेवलेला मांसाचा तुकडा एक गिधाडाने लांबवला.

यामुळे क्रुद्ध झालेली ती कोल्ही त्या मांसखंडासह उडत चाललेल्या गिधाडाकडे रागाने बघत राहिली असता, ती बाई तिला म्हणाली, ‘हे कोल्हे, तोंडातला हक्काचा मांसखंड इथे टाकून त्या बेभरंवशाच्या माशामागे धावणारी आणि अखेर त्या दोघांनाही गमावून बसणारी तू किती मूर्ख आहेस ?’ यावर त्या फटकळ कोल्हीने त्या बाईला प्रश्न केला, ‘काय ग, लग्नाच्या हक्काच्या नवर्‍याला सोडून, त्या अनोळखी माणसाच्या नादी लागलेली आणि अखेर नवरा व तो प्रियकर यांच्याबरोबरच पैसा, दागदागिने, कपडेलत्ते आणि अब्रू यांना गमावून बसलेली तू शहाणी का?’ तो मगर ही गोष्ट पूर्ण करतो न करतो, तोच समुद्रातून दुसरा एक प्राणी त्या किनार्‍यापाशी आला व त्या मगराला म्हणाला, ‘मगरमामा, एका आडदांड मगराने तुमचे घर बळकावले आहे.’

ही दुसरी वाईट बातमी कानी पडताच, तो मगर एकदम हताश होऊन त्या वानराला म्हणाला, ‘ताम्रमुखा, मी आयुष्यातून पुरता उठलो ! संकट हे कधी एकटेदुकटे येत नाही, हेच खरे. आता या परिस्थितीतून मला तुझ्यासारख्या सज्जनाचा उपदेशच तारू शकेल.’

ताम्रमुख म्हणाला, ‘हे मूर्ख मगरा, सज्जनांचा उपदेश हा फक्त त्या उपदेशाप्रमणे वागणार्‍यांनाच तारक ठरतो. तुझ्यासारख्या चंचलांना नव्हे. तुझ्यासारखे चंचल व मूर्ख लोक गळ्यात घंटा बांधलेल्या त्या मूर्ख उंटाप्रमाणे स्वतःच स्वतःचा नाश करून घेतात.’ यावर ‘तो कसा ?’ असा प्रश्न त्या मगराने केला असता ताम्रमुख वानर त्याला म्हणाला, ‘ऐक-

लब्धप्रणाश

पंचतंत्र-गोष्ट पंचावन्नावी

ज्याला स्वाभिमान नसे, त्याच्या कमरेत लाथ बसे.

विकण्टक नावाच्या नगरीत ‘ईश्वर’ नावाचा एक मध्यम परिस्थितीतील गृहस्थ राहात होता. एकदा त्याचे चारही जावई त्याच्याकडे पाहुणे म्हणून आले. ईश्वर व त्याची पत्‍नी यांनी त्यांचे चांगले आगतस्वागत केले व त्यांना जेवूखाऊ घातले. पण पुरते सहा महिने होऊन गेले तरी ते जाण्याचे नाव काढीनात. तेव्हा ईश्वर आपल्या बायकोला म्हणाला, ‘आपले जावई भलतेच चिवट आहेत. त्यांचा अपमान केल्याशिवाय ते निघून जाणार नाहीत. म्हणून आज जेवणाच्या वेळी तू त्यांना पाय धुवायला पाणी देऊ नकोस.’ बायकोने ही सूचना अंमलात आणताच फक्त मोठा जावई तेवढा रागाने निघून गेला.

दुसर्‍या दिवशी त्या गृहस्थाच्या सूचनेवरून त्याच्या बायकोने उरलेल्या तिघा जावयांना बसायला अगदी लहान पाट दिले. तेव्हा क्रमांक दोनचा जावई डोक्यात राख घालून घरी निघून गेला.

तिसर्‍या दिवशी सासूने पतीच्या सूचनेनुसार त्या उरलेल्या दोन जावयांना ताटांत आदल्या दिवशीचे उरलेले शिळे अन्न वाढले. त्यामुळे तिसर्‍या क्रमांकाच्या जावयाच्या रोमारोमात अंगार फुलला आणि पाय आदळीत आपटीत तोही निघून गेला. उरलेला चौथा जावई मात्र कुठलाच अपमान मनाला लावून घेत नसल्याचे पाहून, सासर्‍याने त्याला गचांडी देऊन घालवून लावला.

ताम्रमुख ही गोष्ट पूर्ण करतो न करतो तोच समुद्रातला एक प्राणी नजिकच्या किनारी आला आणि त्या मगराला उद्देशून म्हणाला, ‘मगरमामा, त्या जांभूळखाऊ वानराचे गोड काळीज आणून देण्याचे वचन देऊन तुम्ही घरातून बाहेर पडल्याला बराच वेळ झाला तरी परत आला नाहीत, तेव्हा तुमचे आता बायकोवर प्रेम उरले नाही, असा समज करून घेऊन मगरमामींनी देहान्त करून घेतला.’

हे वृत्त ऐकून तो मगर मोठ्याने रडत रडत म्हणाला, ‘अरेरे ! किती दुर्दैवी मी ! म्हटलंच आहे ना ?-

माता यस्य गृहे नास्ति भार्या च प्रियवादिनी ।

अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम् ।

(ज्याच्या घरात आई व गोड बोलणारी पत्‍नी नसते, त्याने बेशक अरण्यात जावे, कारण त्याच्या दृष्टीने अरण्य व घर ही सारखीच असतात.)

याप्रमाणे रडता रडता मधेच ‘आता मी काय करू?’ अशा प्रश्न त्याने ताम्रमुखाला विचारला असता तो म्हणाला, ‘अरे मूर्खा, जिने तुला तुझ्या मित्राला कपटाने मारण्याचा सल्ला दिला व तुला घरी परतायला जर उशीर होताच संशयाने ग्रासून जिने देहान्त करून घेतला अशा स्त्रीला काय बायको म्हणायचं? म्हटलंच आहे ना ?

या भार्या दुष्टचरिता सततं कलहप्रिया ।

भार्यारूपेण सा ज्ञेया विदग्धैर्दारुणा जरा ॥

(जी बायको वाईट वागणुकीची असून नेहमी भांडण करण्यात गोडी मानणारी असते, ती बायको नसून बायकोच्या रूपाने अवतरलेली पण वृद्धपण आणणारी एक ब्यादच असते.)

मगर म्हणाला, ‘तू म्हणतोस तो मुद्दा जरा बाजूला ठेवू. पण बायकोपरी बायको गेली आणि तुझ्यासारख्याशी असलेली मैत्रीही संपुष्टात आली. तेव्हा आता मी काय करू ? कारण माझी गत त्या गोष्टीतल्या शेतकर्‍याच्या बायकोसारखी झाली आहे.’

यावर म्हणजे कशी ?’ अशी पृच्छा त्या वानराने केली असता तो मगर सांगू लागला-