अपरीक्षितकारक

पंचतंत्र-गोष्ट त्र्याहत्तरावी

क्षुल्लक मानू नये कुणाला, प्रसंगी महत्त्व प्रत्येकाला.

एका गावात ‘ब्रह्मदत्त’ नावाचा एक ब्राह्मण तरुण राहात होता. एकदा तो बाहेरगावी जायला निघाला असता, त्याची आई त्याला म्हणाली, ‘बाळा, तू असा एकटा प्रवास करू नकोस. प्रवासात नेहमी कुणालातरी सोबतीला घ्यावे.’

‘पण आई, मी जाणार असलेल्या मार्गावर कुणाचेच भय नसल्याने, मला कुणाच्याही सोबतीची गरज नाही.’ असे ब्रह्मदत्त म्हणाला असतानाही, त्याच्या आईने परसदारी असलेल्या विहिरीतून एक खेकडा आणला आणि एका कापडाच्या तुकड्यात कापरांच्या वड्यांसह तो घालून व कापडाची पुरचुंडी करून, तिने तो खेकडा सोबतीसाठी त्याच्या स्वाधीन केला.

बाहेरगावची वाट चालता चालता उन्हे उभी राहिल्याने तो तरुण वाटेत लागलेल्या एका छायाळ वृक्षाखाली विश्रांतीसाठी म्हणून आडवा झाला आणि पडल्या पडल्या त्याचा डोळा लागला. तेवढ्यात एका वृक्षाच्या ढोलीतून एक जहरी नाग बाहेर पडला व त्या तरुणापाशी गेला. पण त्याच्याजवळच असलेल्या त्या पुरचुंडीतून कापराचा वास बाहेर पडू लागल्याने व सापाला कापूर प्रिय असल्याने, तो आपल्या अणकुचीदार दातांनी ती पुरचुंडी उलगडू लागला. ती तशी उलगडली जाताच, तिच्यातून बाहेर पडलेल्या खेकड्याने आपल्या नांग्यांच्या कैचीत त्या नागाचे मानगूट आवळून त्याला ठार केले. जाग आल्यावर जेव्हा त्या तरुणाच्या दृष्टीस – आपण झोपेत असताना घडलेला प्रकार कळला, तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला, ‘आई म्हणाली तेच खरे. या जगात कुठलीच गोष्ट क्षुल्लक नसते. प्रसंग येताच तिचे महत्त्व पटते. मग आपल्या आईच्या धोरणी वृत्तीचे मनात कौतुक करीत तो तरुण पुढल्या वाटेला लागला.’

चक्रधराने ही गोष्ट सांगताच सुवर्णसिद्धी त्याला म्हणाला, ‘मित्रा, खेकडा हा कितीही जरी क्षुद्र असला, तरी सर्पाची मानगूट पकडून त्याला मारण्याचे सामर्थ्य त्याच्यात होते. इथे तसे नाही. कुबेराच्या सेवकांनी दिलेल्या शिक्षेतून तुझी सोडवणूक करायला गेलो, तर माझ्याही पाठीशी अशीच एखादी भयंकर उपाधी लागण्याची शक्यता आहे. तेव्हा तांब्याच्या खाणीवर व रुप्याच्या खाणीवर संतुष्ट असलेले आपले ते दोन मित्र वाट पहात राहिले असल्याने, त्यांच्या संगतीसोबतीने गावी जाणे मी पसंत करतो.’ असे म्हणून सुवर्णसिद्धी निघून गेला.

अशा या मनोरंजक पण बोधप्रद गोष्टी त्या तीन राजकुमारांना सांगून ‘पंचतंत्राच्या’ पाचव्या तंत्राची समाप्ती करताना विष्णुशर्माने त्यांना मुद्दामच विचारले, ‘बाळांनो, या गोष्टी ऐकण्यात तुमचा वेळ चांगला गेला ना?’ यावर ते राजकुमार नम्रपणे अभिवादन करून म्हणाले, ‘गुरुदेव, आयुष्याचा मौल्यवान वेळ नुसत्याच मनोरंजनात घालविणे, हे निष्क्रियतेचे व सामान्य बुद्धी असल्याचे लक्षण आहे. आयुष्याचा क्षण अन् क्षण सत्कारणी लावला पाहिजे. या मनोरंजक पण बोधप्रद गोष्टींतून आपण आम्हाला या जगाकडे पाहण्याची व या जगात वागण्याची एक नवी दृष्टी दिलीत. आपण दिलेली ही ‘शिदोरी’ घेऊन, आम्ही आयुष्याची पुढली वाटचाल यशस्वीपणे करू. फक्त आपले आशीर्वाद आम्हाला द्या.’

विष्णुशर्मा हात उंचावून म्हणाला, ‘तथास्तु !’

॥ पाचवे तंत्र समाप्त ॥

Incoming search terms:

  • पंचतंत्र कथा marathi story
  • स्तन त्याची चरबी
अपरीक्षितकारक

पंचतंत्र-गोष्ट बहात्तरावी

हेकटपणाचे वागणे म्हणजे स्वनाशाला आमंत्रण देणे.

एका सरोवरात एकच पोट पण दोन तोंडे असलेला ‘भारुंड’ नावाचा पक्षी राहात होता. एकदा समुद्रकिनारी तो हवेतून संचारत असता, त्याला पाण्यावर तरंगत असलेले एक सुंदर फळ दिसले. आपल्या एका तोंडाने ते फळ अर्धवट खाऊन झाल्यावर, तो पक्षी त्याच तोंडाने म्हणाला, ‘वाः ! आजवर अनेक फळे खाल्ली पण असे अमृतमधुर फळ कधी माझ्या खाण्यात आले नव्हते.’

त्याचे ते बोलणे ऐकून त्याचे दुसरे तोंड त्याला म्हणाले, ‘धनी, त्या अमृतमधुर फळाचा आस्वाद घेण्याची संधी तुम्ही फक्त त्याच तोंडाला दिलीत. ते फळ जर इतके गोड आहे, तर त्याचा उरलेला अर्धा भाग तुम्ही मला द्या ना?’

यावर तो पक्षी म्हणाला, ‘अरे, कुठलीही वस्तू या तोंडाने खाल्ली काय, किंवा तू खाल्लीस काय, शेवटी ती वस्तू एकाच पोटात जाऊन शरीराच्या सर्व अवयवांना उपयोगी पडते ना? त्यातूनही हे फळ मी तुला दिले असते. पण मला ते माझ्या लाडक्या भारुंडीसाठी घरी न्यायचे आहे.’ त्या भारुंड पक्ष्याच्या बोलण्याने ते दुसरे तोंड रागावले.

काही दिवसांनी तो पक्षी असाच घिरट्या घालत असता त्याला एक फळ दिसले. त्याच्याजवळ जाताच त्या दुसर्‍या तोंडाने ते पटकन् उचलले, पण ते विषारी असल्याचे त्याला आढळून आले. तेव्हा ते तोंड निराशेने म्हणाले, ‘अरेरे ! माझे नशीबच वाईट ! त्या दिवशी त्या तोंडाला अमृततुल्य फळ मिळावे, आणि आज माझ्या वाट्याला मात्र हे फळ यावे ? मग असले दुर्दैवी जीवन जगण्यापेक्षा हे विषारी फळ खाऊन मेलेलेच काय वाईट ?’

यावर भारुंड त्या तोंडाला म्हणाला, ‘अरे, असं करू नकोस. ते फळ जरी तू खाल्लेस, तरी तुझ्याबरोबर सर्व अवयवांना व शेवटी मलाही मरावे लागेल.’ पण हे ऐकूनही ते तोंड आपला हेकटपणा सोडीना. त्याने ते फळ खाल्ले व त्यामुळे त्या भारुंड पक्ष्याला मरण आले.’ ही गोष्ट सांगून सुवर्णसिद्धी तिथून काढता पाय घेऊ लागला असता, चक्रधर त्याला म्हणाला, ‘मी माझ्या हेकटपणाने हे संकट पाचारलं असलं तरी तू मला सोडून जाऊ नकोस.’

‘माझी जर तुला मदत होण्यासारखी नाही, तर मग इथे उगाच कशाला राहू?’

‘असं तू म्हणू नकोस. जगात कुणाची, कुणाला व कुठे मदत होईल ते सांगता येत नाही. म्हणून तर एक क्षुल्लक खेकडा एका ब्राह्मण तरुणाचे प्राणांतिक संकटातून रक्षण करू शकला ना ?’ यावर ‘ते कसे?’ असा प्रश्न सुवर्णसिद्धीने केला असता, चक्रधर त्याला ती गोष्ट सांगू लागला-

Incoming search terms:

  • राजकन्येचा लहान
  • वयात आली
  • मुलगी वयात आली
अपरीक्षितकारक

पंचतंत्र-गोष्ट एकाहत्तरावी

नशीब असे जोराचे, तेव्हा अमृत बने विषाचे.

उत्तरेकडील मधुपूर राज्याचा राजा ‘मधुसेन’ याला एक अत्यंत देखणी, परंतु तीन स्तने असलेली मुलगी झाली. ‘ही अशुभलक्षणी मुलगी आपल्या राज्याचा व घराण्याचा सत्यानाश करील. तेव्हा आताच सेवकांकरवी हिला वनातील वन्य श्वापदांच्या स्वाधीन करावे,’ असा विचार राजाच्या मनात येऊ लागला असता, काही विशालह्रदयी धर्मपंडित त्याला म्हणाले, ‘महाराज, काही झाले तरी ही आपली मुलगी आहे. तेव्हा हिला वनात सोडून न देता, हिचे आपल्याला चुकूनही दर्शन होणार नाही, एवढ्या दूरच्या स्थळी हिला दासदासींबरोबर पाठवावे व त्यांनाच तिचे लालनपालन करायला सांगावे.’ राजाने त्याप्रमाणे केले.

अशी काही वर्षे निघून जाताच, ती मुलगी वयात आली, तेव्हा राजाने सेवकांकरवी राज्यात दवंडी पिटविली, ‘जो कुणी तीनस्तनी राजकन्येशी लग्न करील, त्याला एक लाख सुवर्णमोहोरा हुंडा म्हणून देण्यात येईल. मात्र लग्न होताच त्याला व तिला दूरवर पाठविण्यात येईल.’ एका गरीब आंधळ्याने ते मान्य केले व त्याचे तिच्याशी लग्न झाले.

लग्न झाल्यावर आपल्या तीनस्तनी बायकोसह दूरदेशी जाताना त्या आंधळ्याने, त्याला कुठेही जायचे असले तर, त्याचा हात आपल्या हाती घेऊन पोहोचविणार्‍या आपल्या एका कुबड्या मित्रालाही बरोबर घेतले. पण दूरदेशी जाऊन बिर्‍हाड थाटल्यावर थोड्याच दिवसांत त्या राजकन्येच्या मनात विचार येऊ लागला, ‘आपण एवढ्या सुंदर असूनही आपल्या नवर्‍याला दिसत नसल्याने तो आपल्या रूपाचे कौतुक करीत नाही. तेव्हा याच्यापेक्षा त्या डोळस कुबड्याशी जर आपले लग्न झाले असते, तर बरे झाले असते.’

मनात हा विचार येऊ लागताच, एकदा ती त्या कुबड्याला म्हणाली, ‘तुम्ही जर वीष आणून दिलेत, तर मी ते जेवणातून माझ्या आंधळ्या नवर्‍याला घालीन आणि तो मेला की तुमच्याशी लग्न करीन.’

तिच्या या कल्पनेवर कुबडा एकदम खुश झाला व थोड्याच वेळात एक मेलेला विषारी सर्प घेऊन घरी आला. मग तो तिला म्हणाला, ‘मी या सर्पाचे लहान लहान तुकडे करतो. तू त्याचे सांबार कर व जेवताना नवर्‍याला खायला घाल, म्हणजे तुझीमाझी इच्छा फलद्रूप होईल.’ याप्रमाणे बोलून त्या कुबड्याने त्या सर्पाचे तुकडे करून तिच्या स्वाधीन केले व तो घराबाहेर पडला.

इकडे त्या राजकन्येने त्या तुकड्यांमधे मालमसाला घालून, त्याचे सांबार करण्यासाठी ते एका वेगळ्या चुलीवर रांधले व आपल्या आंधळ्या पतीच्या हाती एक पळी देऊन ‘ते माशांचे कालवण या पळीने अधुनमधून ढवळत राहा,’ असे सांगितले आणि त्याचा हात धरून त्याला त्या चुलीपाशी नेऊन बसविले. मग ती आपल्या नेहमीच्या चुलीवर स्वैपाक करायला गेली.

तो आंधळा त्या चुलखंडापाशी सांबार पळीने ढवळत असता, त्यातून निघणार्‍या वाफा त्याच्या डोळ्यांना लागून त्याला चांगली दृष्टी आली आणि सांबारात रटरटत असलेले ते सापाचे तुकडे पाहून आपणाविरुद्धच्या कारस्थानाची त्याला कल्पना आली. तरीही तो आंधळेपणाचे सोंग पांघरून वावरू लागला. तेवढ्यात बाहेर गेलेला कुबडा आत आला आणि ‘सापाचे सांबार तयार होत आले का?’ असे त्या राजकन्येला खुणांनी विचारू लागला. त्याबरोबर ती राजकन्या त्याला हळूच सांगण्यासाठी त्या चुलीजवळून उठली आणि त्याच वेळी त्या डोळस आंधळ्याने त्या कुबड्याकडे धाव घेतली. मग त्याचे दोन पाय पकडून व त्याला गरगर फिरवून त्याने त्याला आपल्या बायकोच्या अंगावर भिरकावले. त्यामुळे त्याचे मस्तक थाडकन् तिच्या तिसर्‍या स्तनावर आदळून तो स्तन नाहीसा झाला व तो कुबडा नंतर जोराने जमिनीवर पाठमोरा आदळल्याने त्याच्या पाठीतले कुबड नाहीसे झाले !

मग लज्जित झालेला तो ‘कुबडा’ तिथून कायमचा निघून गेला आणि पश्चात्तापाने पावन झालेल्या त्या राजकन्येचा व तिच्या त्या डोळस नवर्‍याचा संसार सुखाने सुरू झाला.’

ही गोष्ट सांगून चक्रधर म्हणाला, ‘मित्रा, ‘कर्म तसे फळ’ हे तुझे म्हणणे खरे असते, तर त्या राजकन्येचे व कुबड्याचे कर्म वाईट असता, त्यातून त्यांना चांगले फळ मिळाले असते का?’

सुवर्णसिद्धी म्हणाला, ‘कुठेतरी कधीतरी घडून येणार्‍या घटनेचा दाखला पुढे करून सिद्धांत सिद्ध होत नाही. अविचाराने प्रत्येक बाबतीत वाद घालत राहिल्याने, पदरात केवळ हानीच पडते. म्हणून हेकटपणाने वागणे सोडून द्यावे. एक पोट पण तोंडे मात्र दोन असलेल्या त्या भारुंड पक्ष्यांच्या दोन्ही तोंडांचे एकमेकांशी न पटल्यामुळेच त्या पक्ष्याचा नाश झाला ना?’ यावर तो कसा?’ असा प्रश्न चक्रधराने असता सुवर्णसिद्धी म्हणाला, ‘ऐक-

Incoming search terms:

  • माशांचे कालवण
अपरीक्षितकारक

पंचतंत्र-गोष्ट सत्तरावी

कधी कधी अपूर्व योग जुळून येती व अशक्य गोष्टी प्रत्यक्षात उतरती !

‘भद्रसेन’ नावाच्या एका राजाची मुलगी ‘रत्‍नवती’ हिच्या प्राप्तीसाठी एक राक्षस धडपड करू लागला. तिच्या लक्षात ही गोष्ट आली व एके रात्री, तिच्या महालात आलेल्या तिच्या मैत्रिणीला ती म्हणाली, ‘सखे, एक राक्षस अकाली माझ्याकडे येण्याचा प्रयत्‍न करीत असतो. कोणत्या उपायाने मी त्याचा प्राण घेऊ ?’

वास्तविक राजकन्येने एक राक्षस अकाली येतो असे म्हटले होते त्याचा अर्थ ‘नको तेव्हा’ असा होता, पण त्याच महालाबाहेरील अंधाराच्या आडोशाला उभ्या असलेल्या त्या राक्षसाचा गैरसमज झाला. त्याला वाटले, आपल्याप्रमाणे ‘अकाली’ नावाचा दुसराही एक राक्षस हिच्या प्राप्तीसाठी धडपडत आहे. तेव्हा त्या राक्षसाने मायेच्या सहाय्याने एका उमद्या घोड्याचे रूप घेतले व दुसरा राक्षस पहायला मिळावा म्हणून तो राजकन्येच्या महालापासून थोड्या अंतरावर उभा राहिला.

तेवढ्यात तिथे एक चोर आला आणि ‘हा घोडा छान आहे,’ असे स्वतःशी म्हणून त्याच्यावर स्वार झाला व त्याला दौडवू लागला. त्या प्रकाराने घोड्याच्या रूपात असलेला राक्षस घाबरला. ‘याने आपल्याला ओळखले असावे, हा आता आपल्याला दूर नेणार व आपला जीव घेणार,’ असा समज होऊन तो वेगाने पळू लागला. गंमत अशी की ‘हा अनावर घोडा आपल्याला पाडून टाकील.’ अशा भयाने, तो चोर वाटेत लोंबत असलेल्या एका वडाच्या पारंबीला पकडून लोंबकळत राहिला.

‘चला, आपण त्या अकाली राक्षसाच्या कटकटीतून सुटलो,’ असे मनात म्हणून तो राक्षस मूळ स्वरूप धारण करून पळून जाऊ लागला असता, त्या वटवृक्षावरचा एक विघ्नसंतोषी वानर त्या राक्षसाला म्हणाला, ‘अरे राक्षसदादा, ज्याला तू घाबरत आहेस, तो कुणी महाराक्षस नसून, एक सामान्य माणूस आहे. त्याला खाऊन टाक.’

तेवढ्यात त्या चोराने, फांदीखाली लोंबत असलेल्या त्या कळलाव्या वानराच्या शेपटीला कडकडून चावा घेतला. त्यामुळे तो वानर मोठ्याने चीत्कारला. त्या वानराचा तो भयंकर आवाज ऐकून, त्याच्याकडे पाहून तो राक्षस म्हणाला, ‘अरे मर्कटा, त्या अकाली राक्षसाने तुला खायला सुरुवात केली असल्याने तुझा चेहेरा अगोदरच भयग्रस्त झाला आहे. तशाही स्थितीत त्या राक्षसाने मलाही खावे म्हणून तुझा प्रयत्‍न चालला आहे. पण मी असा फसणार नाही.’ असे म्हणून तो राक्षस पळून गेला.

ही गोष्ट सांगून सुवर्णसिद्धी म्हणाला, ‘चक्रधरा, तुझा चेहेराही आता त्या ‘अकाली’ राक्षसाच्या तावडीत सापडलेल्या वानराच्या चेहेर्‍याप्रमाणे भयग्रस्त झाला आहे. तो मला बघवत नसल्याने मी तुझा निरोप घेतो. तुझ्या कर्माची फळे तू भोग.’

चक्रधर त्राग्याने म्हणाला, ‘मित्रा, चांगली कर्मे केली की चांगली फळे मिळतात. आणि वाईट कर्मे केली की, वाईट फळे पदरात पडतात, हे बोलणे खोटे आहे. रावणाने एवढ्या बंदोबस्तात बांधलेल्या लंकानगरीचीसुद्धा, त्या मारुतीने राखरांगोळी केली, आणि वाईट कर्मे करूनसुद्धा आंधळा, कुबडा व ती तीन स्तनांची राजकन्या सुखी झाली.’

यावर हे तीन स्तनांच्या राजकन्येचे प्रकरण काय आहे?’ असे सुवर्णसिद्धाने विचारले असता चक्रधर म्हणाला, ‘ऐक-

Incoming search terms:

  • स्तनांची गोष्ट
अपरीक्षितकारक

पंचतंत्र-गोष्ट एकोणसत्तरावी

जो लोभाच्या आहारी जाई, त्याच्या जीवनातले सुख नाहीसे होई.

चंद्र नावाच्या राजाने आपल्या लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बरीच वानरे पाळली होती व सेवकांच्या सहाय्याने त्यांची चांगली बडदास्त ठेवली होती. त्या वानरांचा जो म्होरक्या होता, तो अतिशय बुद्धिमान् व बहुश्रुत होता.

त्या राजाने आपल्या मुलांच्या खेळातल्या गाड्यांना जुंपण्यासाठी काही मेंढेही पाळले होते. त्यांतलाच एक खादाड मेंढा वेळीअवेळी मुदपाकखान्यात शिरून तिथल्या पदार्थांवर तुटुन पडे. मग त्याला हाकलून देण्यासाठी तिथले आचारी हाती लागेल ती गोष्ट, त्याच्यावर भिरकावून त्याला घालवून देत. ते आचारी व तो मेंढा यांचा असा झगडा जवळजवळ दररोज चाले.

तो प्रकार पाहुन एकदा तो वानरप्रमुख आपल्या जातभाईंना जवळ बोलावून त्यांना म्हणाला, ‘इथे आता तंटेझगडे ही नित्याची बाब होऊन बसली असल्याने, या ठिकाणी राहाणे धोक्याचे आहे. तेव्हा आपण इथुन कुठेतरी निघून जाऊ या. कारण म्हटलंच आहे -

कलहान्तानि हर्म्याणि कुवाक्यान्तं च सौह्रदम् ।

कुराजान्तानि राष्ट्राणि कुकर्मान्तं यशो नृणाम् ॥

(मोठमोठ्या घरांचा नाश भांडणांनी होतो. मैत्रीचा शेवट कटु शब्दांनी होतो, राष्ट्रांचा नाश वाईट राजांमुळे होतो आणि वाईट कृत्यांमुळे माणसांच्या यशाचा शेवट होतो.)

‘पण त्या दांडगट मेंढ्याच्या व आचार्‍यांच्या भांडणाची झळ आपल्याला कशी काय पोहोचू शकते ?’ मधेच एका तरुण वानराने प्रश्न केला.

यावर तो वानरप्रमुख म्हणाला, ‘असं समजा, एखाद्या दिवशी, तो मेंढा मुदपाकखान्यात शिरला असता कुणा आचार्‍याने त्याच्या अंगावर पेटते कोलीत फेकले, तर त्या मेंढ्याच्या अंगावरची लोकर पेट घेईल. मग तो भयभीत झालेला मेंढा इकडे तिकडे धावत, मुदपाकखान्याजवळ असलेल्या गवताच्या गंजीकडे गेला, की ती गंजीच नव्हे, तर तिला लागून असलेली घोड्यांची पागाही पेट घेईल आणि तीत असलेले घोडे भाजून मरतील किंवा होरपळून निघतील. तसे झाले तर शालिहोत्र याच्या जनावरांच्या रोगावरील उपचारग्रंथात सांगितल्याप्रमाणे आगीमुळे घोड्यांना होणार्‍या जखमांवर वानरांची चरबी हा रामबाण उपाय असल्याने, चंद्रराजा त्या चरबीसाठी आपणा सर्वांना ठार मारील.’ पण वानरप्रमुखाचं हे म्हणणं राजवाड्यात मिळणार्‍या उत्तमोत्तम पदार्थांची चटक लागलेल्या त्या वानरांना पटले नाही. तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हाला नसले यायचे, तर येऊ नका. पण मी मात्र जाणार. कारण म्हटलंच आहे-

मित्रं व्यसनसम्प्रासं स्वस्थानं परपीडितम् ।

धन्यास्ते ये न पश्यन्ति देशभङ्गं कुलक्षयम् ॥

(संकटात सापडलेला मित्र, दुसर्‍याकडून त्रास होणारे आपले घर, देशाची फाळणी, किंवा कुलक्षय झालेला पाहाण्याचा ज्यांच्यावर प्रसंग येत नाही, ते खरोखरच धन्य होत.)

याप्रमाणे बोलून तो वानरप्रमूख तिथून वनात निघून गेला.

परंतु थोड्याच दिवसांत त्या वानरप्रमुखाच्या कानी आपण केलेले भाकित खरे ठरल्याचे आले. आपल्या सर्व आप्तमित्रांना राजाने चरबी मिळविण्यासाठी मारल्याचे ऐकून तो अतिशय अस्वस्थ झाला व मनात म्हणाला, ‘माझे न ऐकता ते माझे आप्तमित्र तिथे राहिले हे खरे. पण कसेही झाले तरी ते माझेच ना ? मग माझ्या आप्तमित्रांना ज्याने जिवे मारले, त्या राजावर सूड उगवायला नको का ? कारण म्हटलंच आहे -

मर्षयेद्धर्षणां योऽत्र वंशजां परनिर्मिताम् ।

भयात् वा यदि वा कामत् स ज्ञेयः पुरुषाधमः ॥

(परक्यांकडून आपल्या कुटुंबियांवर हल्ला केला गेला असता, भीती वा स्वार्थ यांमुळे जो तो सहन करतो असा पुरुष नीचात नीच समजावा.)

अशा तर्‍हेनं आपल्या गणगोताचा संहार केल्याबद्दल राजावर सूड उगविण्याचा विचार करीत तो वानरप्रमुख एका सरोवरापाशी गेला. त्या सरोवरात विपुल रत्‍ने होती. सरोवराच्या पाण्यावर सूर्यप्रकाश पडला की ती रत्‍ने चमकू लागत व ती मिळविण्यासाठी त्या सरोवरात शिरणारी माणसे, त्यात राहणार्‍या एका राक्षसाच्या भक्ष्यस्थानी पडत. त्या राक्षसाची भेट घेऊन त्या वानरप्रमुखाने आपल्या बंधुबांधवांच्या संहाराची सर्व हकीकत त्याला सांगितली व राजाला त्याच्या परिवारासह त्या सरोवराकडे आणण्याकरिता त्याच्याकडे एक दिव्य रत्‍नमाला मागितली. ती मिळताच तो त्या राजाच्या वाड्यासमोरच्या एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसला.

सूर्यकिरणे पडताच झगमगणारी ती रत्‍नमाला पाहून राजा तिच्याकडे लोभी नजरेनं टकमक बघू लागला. त्याने त्या वानराला विचारले, ‘काय रे ही दिव्य रत्‍नमाला तुला कुठे मिळाली ? तू ती मला देतोस का?’

राजाचा हा प्रश्न ऐकून तो वानरप्रमुख मनात म्हणाला, ‘स्वतःपाशी गडगंज संपत्ती असलेला हा राजा ! पण माझ्या अपेक्षेप्रमाणे याचाही जीव माझ्यापाशी असलेल्या माळेत गुंतलाच ! बाकी त्यात नवल ते काय ? लोभ किंवा हाव ही चीजच मोठी अजब आहे. म्हटलंच आहे ना ?-

इच्छति शती सहस्त्रं सहस्त्री लक्षमीहते ।

लक्षाधिपस्तस्था राज्यं राज्यस्थः स्वर्गमीहते ॥

(शंभराचा स्वामी असलेला हजारांची इच्छा धरतो. हजार असलेला लाखांची अभिलाषा बाळगतो. लक्षाधीशाला राज्य हवेसे वाटते आणी राजपदी असलेला मरणोत्तर स्वर्गाची इच्छा धरतो.)

‘मनुष्य कितीही वृद्ध होवो, त्याचा लोभ किंवा तृष्णा क्षीण न होता, दिवसानुदिवस अधिकाधिक तरुणच होत जाते. म्हटलंच आहे -

जीर्यन्ते जीर्यतः केशा दन्ता जीर्यान्ति जीर्यतः ।

जीर्यतश्चक्षुषी श्रोत्रे तृष्णैका तरुणायते ॥

वृद्धत्वाने केस जीर्ण होतात, वृद्धत्वाने दातही कमकुवत होतात आणि डोळे व कानही क्षीण होतात. पण तृष्णा मात्र तरुण होत राहते.)

अशा तर्‍हेच्या विचारात मग्न झालेल्या त्या वानराला राजाने पुन्हा तोच प्रश्न विचारता तो म्हणाला, ‘महाराज, या राजधानीबाहेरच्या वनात कुबेराने निर्माण केलेले एक सरोवर आहे. रविवारी सकाळी सूर्योदय होता होता, जो जो त्या सरोवरात बुडी घेतो, तो तो गळ्यात असली एक रत्‍नमाला घेऊनच बाहेर पडतो. तुम्ही उद्याच्या रविवारी माझ्या मागोमाग आलात, तर मी तुम्हाला ते सरोवर दाखवीन.’

दुसर्‍या दिवशी सकाळी राजा आपल्या सर्व परिवारासह त्या वानरामागोमाग त्या सरोवराकडे गेला. मग सूर्य उगवू लागल्याचे पाहून त्या वानराने राजाला वगळून इतर सर्वांना त्या सरोवरात उड्या घ्यायला सांगितले. त्याप्रमाणे राजाच्या राण्या, राजकुमार, आप्तेष्ट यांनी उड्या मारल्या. पण बराच वेळ झाला, तरी कुणीच बाहेर येत नाहीसे पाहून, राजाने त्या वानराला विचारले, ‘काय रे, कुठे गेली ही मंडळी ?’ वानर म्हणाला, ‘तुम्ही माझ्या नातेवाईकांना चरबीसाठी मारून जिकडे पाठवून दिले, तिकडे गेली. त्या सर्वांना या सरोवरात राहणार्‍या एका राक्षसाने गिळंकृत केले आहे.’

दुःखाने व्याकूळ व संतप्त झालेल्या राजाने त्या वानराला विचारले, ‘तुझे हे वागणे धर्माला सोडून नाही का?’ यावर वानराने उत्तर दिले, ‘नाही. कारण -

कृते प्रतिकृतिं कुर्यात् हिंसिते प्रतिहिंसितम् ।

न तत्र दोषं पश्यामि दुष्टे दुष्टं समाचरेत् ॥

(एखाद्या कृतीला तशाच प्रतिकृतीने, हिंसेला प्रतिहिंसेने आणि दुष्टपणाला उत्तर द्यावे, यात मला काहीच वावगे दिसत नाही. दुष्टांशी दुष्टपणानेच वागावे.

याप्रमाणे बोलून झाल्यावर ते वानर त्याच्या वाटेने, तर तो राजा त्याच्या मार्गाने निघून गेला.

ही गोष्ट सांगून सुवर्णसिद्धी म्हणाला, ‘चक्रधरा, ज्या लोभाने त्या चंद्रराजाचे अपार नुकसान केले, त्या लोभानेच तू तुझ्या पाठीशी ही चक्राची उपाधी लावून घेतलीस. ठीक आहे. मी आता तुझा निरोप घेऊ का ? कारण एकतर मित्र या नात्याने मी तुला मदत करण्याचे कितीही जरी ठरविले, तरी मी तुला संकटमुक्त करू शकत नाही आणि दुसरे म्हणजे तुझा चेहेरा त्या अकाली राक्षसाला भ्यायलेल्या वानराप्रमाणे दिसत असल्याने, मला तो बघवतही नाही.’ यावर हा ‘अकाली राक्षस कोण?’ असा प्रश्न चक्रधराने केला असता सुवर्णसिद्धी म्हणाला, ‘ऐक-